अमरावती – आंधप्रदेश सरकारने राज्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी एन रमेशकुमार यांना त्यांच्या पदावरून तडकाफडकी हटवले आहे. त्यांचे राज्यातील पंचायत निवडणुकांच्या तारखांविषयी मुख्यमंत्र्यांशी मतभेद झाले होते त्यावरून त्यांना हटवण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यांना या पदावरून हटवण्यासाठी राज्य सरकारने एका अध्यादेशाद्वारे राज्याच्या पंचायत राज कायद्यात बदल करून राज्याच्या मुख्य निवडणूक आधिकाऱ्यांचा कार्यकाल पाच वर्षांवरून तीन वर्षे इतका केला.
त्याच्या आधारे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना हटवण्यात आले. यापुढे केवळ उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधिशच या पदासाठी पात्र ठरतील असेही राज्य सरकारने नव्या अध्यादेशात नमूद केले आहे. राज्य सरकारच्या शिफारशीनुसार राज्यपालांनी या पदावरील व्यक्तीची नियुक्ती करायची आहे अशीही तरतूद राज्य सरकारने अध्यादेशात केली आहे.
राज्यात 7 मार्च रोजी पंचायत राजच्या निवडणूका होणार होत्या पण मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सध्याच्या करोनाच्या कारणामुळे या निवडणुका पुढे ढकलल्या. त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्र्यांशी वाद झाला होता. या निवडणूका पुढे ढकलण्याच्या निर्णयाला आंध्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते पण न्यायालयाने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचाच निर्णय कायम ठेऊन या निवडणूका पुढे ढकलण्यास अनुमती दिली होती त्यामुळे चिडलेल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर ही कारवाई केली असे सांगण्यात येते.