मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. या निवणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके आणि भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यात थेट लढत होणार आहे. या पोटनिवडणुकीमध्ये मनसेची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष असतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निवडणुकीसंदर्भात भाजपाला आवाहन केले आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून भाजपाने ही निवडणूक लढवू नये, अशी विनंती केली असल्याचे म्हटले जात आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले असून भाजपाने ही निवडणूक लढवू नये, अशी विनंती या पत्रातून केली .”दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. या जागेवर रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आमदार झाल्याने त्यांच्या आत्म्याला खरोखर शांती मिळेल,” असे राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणाले आहेत.
“माझी विनंती आहे की, भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पाहावं,” अशी विनंती राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
“मी माझ्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात, तेव्हा शक्यतो निडणूक न लढवण्याचे धोरण स्वीकारतो. तसे करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रद्धांजलीच अर्पण करतो, अशी माझी भावना आहे. आपणही तसे करावे, असे मला माझे मन सांगते. असे करणे हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्वीकार कराल, असे राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणाले आहेत.