मुंबई – येत्या 3 नोव्हेंबरला होणार असलेल्या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ऋतुजा या अंधेरीचे आमदार कै. रमेश लटके यांच्या पत्नी आहेत. पतीच्या अकाली निधनानंतर होत असलेल्या विधासभा निवडणुकीसाठी ऋतुजा यांनी अर्ज भरला आहे. तर विरोधी पक्ष भाजपनेही आपला उमेदवार उभा केला आहे.
भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र आता भाजपने आपला उमेदवाराचा अर्ज मागे घ्यावा आणि ही निवडणुक बिनविरोध करावी असे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. या पत्रात त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा उल्लेख करत एखाद्या ठिकाणी आमदाराचे निधन झाल्यास आणि त्याच्या घरातील व्यक्ती पोटनिवडणुकीत उभा असल्यास निवडणूक बिनविरोध केली जाते याची आठवणही करून दिली आहे.
दरम्यान, या पत्रानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लटके म्हणाल्या, एखाद्या आमदाराचे निधन झाल्यास आणि त्याजागी त्याच्या घरातील व्यक्ती उभा असल्यास पोटनिवडणुक ही बिनविरोधच होते, विरोधी पक्ष कधीही आपला उमेदवार उभा करत नाही. पण याठिकाणी आपलं दुर्दैव किंवा समोरच्या पार्टीच्या मनात काय आहे याची कल्पना नाही. पण त्यांचं काही असेल.. उमेदवार असा आहे की, आपण निवडणुक लढवली पाहिजे. पण माझी इच्छा आणि मला वाटलं होतं की ही निवडणुक बिनविरोधच होईल, असे लटके यांनी म्हंटले आहे.
Andheri By-Election: राज ठाकरेंच्या पत्रावर प्रवीण दरेकरांची स्पष्ट प्रतिक्रिया; म्हणाले – “आमचा उमेदवार विजयी होणार” https://t.co/VkA84mZrTT
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 16, 2022
राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना लिहिलेले पत्र –
राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आमदार कै. रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी विधानसभेच्या जागेसाठी पोट-निवडणूक जाहीर झाली. त्याठिकाणी त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा-प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरु झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने आमदार होण्याने कै. रमेश लटके यांच्या आत्म्यास खकरोखर शांती मिळेल.
माझी विनंती आहे की भाजपने ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावे. मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेंव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणुक लढवतात तेव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रद्धांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं माझं मन सांगते. असं करण हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्विकार कराल. , असे राज ठाकरे यांनी पत्रात लिहिले आहे.
Andheri By-Election: मुरजी पटेलांचं आमदार होण्याचं स्वप्न अधुरं राहणार? फडणवीसांनी राज ठाकरेंच्या पत्रावर दिली “ही’ प्रतिक्रिया https://t.co/xqR3iWelgz
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 16, 2022
दरम्यान, या पत्रावर उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी म्हंटले की, आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन अंधेरी निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचे समर्थन करण्याची विनंती केली. त्यानंतर राज ठाकरे यांनी मला पत्र लिहिले आहे की, भाजप उमेदवाराने अर्ज मागे घ्यावा. पण भाजपमध्ये मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही, त्यांच्या पत्रावर विचार कण्यासाठी मला सहकाऱ्यांशी आणि पक्षात चर्चा करावी लागेल. कारण आम्ही उमेदवार घोषित केला आहे आणि अर्ज देखील दाखल केला आहे.
आम्हाला याआधी जेव्हा योग्य प्रकारे विनंती करण्यात आली तेव्हा अशी भूमिका घेतली होती. आरआर पाटील यांच्या वेळी तशी भूमिका घेतली होती. आता विधानपरिषदेच्या दोन जागांसाठीही घेतली होती. आमच्यासोबत बाळासाहेबांची शिवसेना आहे त्यामुळे मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा करावी लागले. सगळी चर्चा झाल्यानंतरच यापत्राबाबत प्रतिक्रिया देता येईल. त्यांनी चांगल्या भावनेने पत्र पाठवलेले आहे. आम्ही जरूर याचा गांभीर्याने विचार करू. पण सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा लागेल, असे फडणवीस यांनी म्हंटले आहे.
Andheri By-Election: शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधवांनी ‘त्या’ पत्रामुळे मानले राज ठाकरेंचे आभार https://t.co/FOTS1WbDV1
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 16, 2022