मुंबई – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार त्या पक्षाचे उमेदवार मुरजी पटेल यांनी माघार घेतली आहे. त्या मतदारसंघातील आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात भाजपचे मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता; परंतु ऋतुजा लटके यांच्या सहानुभूतीपोटी भाजपने उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भाजपच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
दरम्यान, पराभव समोर असल्याने भाजपने माघार घेतली अशी टीका होतेय, या प्रश्नावर भाजप नेते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. दानवे म्हणाले, असं काही राजकारणात अगोदर ठरवून होत नाही. जसजसे घटनाक्रम बदलतात तसतसा निर्णय घ्यावा लागतो. जर सर्व राजकीय पक्ष शेवटच्या टप्प्यात जर असा विचार करत असेल तर तोही विचार भाजपने विचार केलाआहे. पहिल्या दिवसापासून असं वातावरण नव्हते की, लटके गेले आणि त्यांच्या पत्नीला तिकीट दिले आणि तुम्ही निवडणुक लढवू नका, असे काही नव्हते. भारतीय जनता पार्टीत सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय होत नाही. आम्ही सर्वांनी विचार करून महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे दानवे यांनी सांगितले.
अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतल्यामुळे मुरजी पटेलांचे कार्यकर्ते संतप्त https://t.co/3M4X5DnU5q
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 17, 2022
दरम्यान, अंधेरीच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार माघारी घेऊन ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून द्यावे आणि महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा पाळावी, असे आवाहन मनसेचे प्रमुख राज ठाकरे, शरद पवार आदींनी केली होती. त्यांच्या सूचनांचा विचार करून पक्षात चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितले होते. त्याच वेळी भाजप ही निवडणूक लढवण्याच्या मनःस्थितीत नाही असे चित्र स्पष्ट झाले होते. मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. त्या पार्श्वभूमीवर अंधेरीत भाजपला पराभव पत्करावा लागला असता तर त्याचे विपरीत परिणाम महापालिका निवडणुकीवर झाले असते, असे गणित लक्षात घेऊन भाजपने माघार घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.