मुंबई – अंधेरी पुर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार त्या पक्षाचे उमेदवार मुरजी पटेल यांनी माघार घेतली आहे. त्या मतदार संघातील आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी श्रृतुजा लटके यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात भाजपचे मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु श्रृतुजा लटके यांच्या सहानुभूतीपोटी भाजपने उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती भाजपच्यावतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
अंधेरीच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार माघारी घेऊन श्रृतुजा लटके यांना बिनविरोध निवडून द्यावे आणि महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा पाळावी असे आवाहन मनसेचे प्रमुख राज ठाकरे, शरद पवार आदिंनी केली होती. त्यांच्या सुचनांचा विचार करून पक्षात चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल असे देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितले होते. त्याच वेळी भाजप ही निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत नाही असे चित्र स्पष्ट झाले होते.
मुंबई महापालिकेची निवडणुक तोंडावर आहे. त्या पार्श्वभूमीवर अंधेरीत भाजपला पराभव पत्करावा लागला असता तर त्याचे विपरीत परिणाम महापालिका निवडणुकीवर झाले असते असे गणित लक्षात घेऊन भाजपने माघार घेतल्याचे बोलले जाते.
शिवसेनेच्या उमेदवार लटके यांनी भाजप आणि शिंदे गट वगळता अन्य राजकीय पक्षांनी एकमुखी पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांची बाजू भक्कम झाली होती. आता आम्ही लढण्याच्या क्षणाचीच वाट पहात आहोत असे विधान शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही केले होते. श्रृतुजा लटके यांनी जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी त्यांनी मोठे शक्तीप्रदर्शन तिथे केले होते व त्यात कॉंग्रेस व अन्य पक्षांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे कम्युनिस्ट पक्षाच्यावतीनेही शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करण्यात आला होता. शिवसेना फुटल्यानंतरची ही पहिली निवडणूक असल्याने त्या विषयी मोठे राजकीय कुतुहल निर्माण झाले होते. तथापि आता मुख्य प्रतिस्पर्धी उमेदवारानेच माघार घेतल्यानंतर या निवडणुकीतील चुरस संपुष्ठात आली आहे.
पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला संताप –
भारतीय जनता पक्षाने मुरजी पटेल यांना माघार घेण्याचा आदेश दिल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत संतप्त भावना व्यक्त करीत राज ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. मुरजी पटेल यांनी मतदारसंघातील निवडणुकीसाठी मोठी तयारी केली होती, ती मेहनत वाया गेली असे त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी सांगितले.
पटेल यांच्या निवासाच्या ठिकाणी आज त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने जमले होते. त्यांनी या घडामोडीचे खापर राज ठाकरे यांच्यावर फोडून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या पार्श्वभूमीवर मुरजी पटेल हे अर्ज मागे न घेता अपक्ष म्हणून लढतील अशीही चर्चा ऐकायला मिळाली. पण स्वतः पटेल यांनीच आपण भाजपचे निष्ठावान अनुयायी आहोत, त्यामुळे पक्षाच्या आदेशाच्या विरोधात आपण जाणार नाही, असे स्पष्ट करीत निवडणुकीत अपक्ष म्हणून लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.