नवी दिल्ली – मालदीववर चीनच्या वाढत्या प्रभावामुळे गेल्या काही काळापासून भारत आणि मालदीव यांच्यातले सरकारच्या पातळीवरचे संबंध तितकेसे मधुर राहीलेले नाहीत. तथापि, भारताने अजूनही त्या देशाच्या बाबतीत कोणते कठोर पाउल उचलले नाही.
आताही कोट्यानुसार आवश्यक वस्तूंची निर्यात करण्याची भारताने अनुमती दिल्यामुळे मालदीवच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताचे मनापासून आभार मानले आहेत व धन्यवाद म्हटले आहे. ही बाब दीर्घकालीन मैत्रिचे प्रतिक असल्याचेही मूसा जमीर यांनी नमूद केले आहे.
मी अत्यंत मनापासून भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांचे आभार मानतो. भारत सरकारने कोट्याचे नवीनीकरण करून मालदीवला २०२४ आणि २०२५ मध्ये भारतातून आयात करण्यासाठी सक्षम बनवले आहे.
हा वास्तविक दीर्घ काळापासून असलेल्या मैत्रिचा एक संकेत आहे आणि एक प्रतिक असल्याचे मालदीवचे मंत्री मूसा जमीर यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, भारत आणि मालदीव यांच्यात झालेल्या समझोत्याबाबत मालदीवमधील भारतीय दूतावासानेही एक पोस्ट केली आहे. त्यात भारत मालदीवला निर्यात केल्या जाणाऱ्या सर्व साम्रगीचे प्रमाण वाढवणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
दोन्ही देशांदरम्यान १९८१ पासून ही व्यवस्था लागू असून यंदा त्यात सगळ्यांत जास्त वाढ केली गेली आहे. मालदीवमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बांधकाम उद्योगाला गती मिळाली आहे. अशा स्थितीत त्या देशाला वाळू, दगड आदींच्या निर्यातीचे प्रमाण २५ टक्के वाढवून ते १० लाख मेट्रीक टन करण्यात आले आहे.
अंडी, कांदा, बटाटा, साखर, तांदुळ, गव्हाचे पीठ आणि डाळींच्या निर्यातीच्या कोट्यातही पाच टक्के वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय निर्बंध असतानाही भारताने मालदीवला साखर, कांदा आणि तांदळाची निर्यात जारी ठेवली होती.
भारतीय दूतावासाच्या म्हणण्यानुसार भारताच्या शेजारी प्रथम या धोरणानुसार भारत मालदीवला आवश्यक वस्तूंची निर्यात करतो आहे. मोहम्मद मुइज्जू मालदीवचे राष्ट्रपती झाल्यानंतर ते भारताच्या संदर्भात चीनच्या भाषेत बोलू लागले असल्यामुळे उभय देशांच्या इतक्या वर्षांच्या संबंधांत काहीशी कटुता आली.
मात्र असे असूनही आवश्यक वस्तूंच्या निर्यातीचा समझोता भारताने केवळ पाळला नाही तर त्यात वाढही केल्यामुळे मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाला भारताचे जाहीरपणे आभार मानावे लागले आणि मैत्रीचाही दाखला द्यावा लागला.