मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी शिवसेनेतून बंड पुकारला. त्यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. मात्र बंडादरम्यान आमदार नितीन देशमुख हे तिथून निघून आले होते. त्यांच्या या पलायनाची सर्वत्र चर्चा रंगली होती. शिवसेनेच्या पॉडकास्टमध्ये बंडादरम्यानच मोठा गौप्यस्फोट नितीन देशमुख यांनी केला आहे.
शिंदेंच्या बंडावेळी तेही शिंदेंबरोबर सुरत आणि मग गुवाहाटीला नितीन देशमुखही गेले होते. मात्र कसेबसे तेथून त्यांनी पळ काढला होता. मात्र हा बंड करण्याचे नियोजन हे आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्या दरम्यानच ठरला असल्याचे देशमुख यांनी खुलासा केला. मात्र काही कारणामुळे ते नियोजन फसल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी नितीन देशमुख यांनी सूरतमध्ये जाण्यापूर्वी नेमके काय घडेल याचा सर्व घटनाक्रम सांगितला.
नितीन देशमुख म्हणाले की, “एकनाथ शिंदेंनी गाडीत बसवून ठाण्याऐवजी पालघरला नेले. तिथे एका हॉटेलवर मी आणि एकनाथ शिंदे उतरलो. तिथे अचानक अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, शंभूराज देसाईंची गाडी आली. मला थोडी कुणकुण लागली. तिथल्या पानटपरीवाल्याला मी तो रस्ता कुठे जातो ते विचारलं. तर तो म्हणाला हा रस्ता सूरतला जातो. तिथून 100 किलोमीटर सूरत होतं. त्यानंतर गाडीत फोन सुरू झाले, तेव्हा मला समजले की काहीतरी गडबड आहे.”
त्यानंतर मी सावंत साहेबांना गाडीतून फोन लावला. कोणाला लक्षात येऊ नये यासाठी मी माझी बायको प्रांजलीशी बोलतोय असं नाटक करून सावंत साहेबांना फोन केला. मी म्हटलं मी सूरतला चाललो, शिंदे साहेब सोबत आहेत. दोन मंत्री बसलेत, सरकार पाडायचं वगैरे चाललंय असं सांगितलं. सावंत साहेब मला म्हणाले तू लगेच उतर गाडीतून. पण मला गाडीतून उतरता येत नव्हतं. तेव्हाच एक माणूस पळत आला आणि शिंदेंना सांगितलं की कैलास पाटील पळून गेले. मी म्हटलं, चला एक आमदार गेला.”
… आणि मी रस्त्याने पळत सुटलो
“मी शिंदेंना बाजूला नेऊन सांगितले उद्धव ठाकरेंशी चर्चा करा, कारण हे काही मला पटत नाही. मी इथे थांबणार नाही. ते म्हणाले तुला मी एवढं सहकार्य केलं, तू असं कसं करतो? मी म्हटलं मेलो तरी इथे थांबणार नाही. पण मला बाहेरून पोलीस बाहेर जाऊ देत नव्हते. मग शिंदे साहेब माझ्याबरोबर पुढच्या चौकापर्यंत आले. तिथून मी रस्त्याने पळत सुटलो, तेव्हा माझ्यामागे पोलीसही होते”, असा मोठा गौप्यस्फोट देशमुखांनी केला.