अरुण गोखले
असाच एक उत्सव. देवाचं मंदिर भक्त-भाविकांच्या गर्दीने भरलेले होते. देवदर्शनासाठी भक्तांची भली मोठी रांग लागली होती. ती दर्शनाची रांग हळूहळू पुढे सरकत होती. प्रत्येकजण त्या गर्दीत आपापल्या हातातले पूजा साहित्य, हारफुले, नारळ, उदबत्ती, कापूर, प्रसादाचे पुडे हे सावरीत होता. त्याच देवदर्शनाच्या गर्दीत एक भोळाभाबडा भक्तही देवाच्या दर्शनासाठी हळूहळू त्या रांगेतून पुढे सरकत होता. पण का कोणास ठाऊक आता मात्र त्याच्या मनात असा विचार येत होता की, उगाच आपण या लोकांच्या गर्दीत आलो.
त्याचे मन त्याला म्हणत होते, जरा डोळे उघडून भोवतीच्या लोकांकडे नीट बघ तरी. बघ बरं इथं कोणी तरी तुझ्यासारखा रिकाम्या हाताने देवदर्शनाला आला आहे का? नाही ना? प्रत्येकापाशी काही ना काही तरी आहेच. ते पाहून तो भक्त मनात खजील झाला. कारण द्यायला त्याच्याकडे होतेच काय! ना स्वत:च्या अंगावर अंगभर वस्र, ना कनवटीस पैसा, ना हातात प्रसादाची पुडी, ना नारळ, ना साधा उदबत्तीचा पुडा किंवा चिमूटभर खडी साखर. मग जर आपण त्या देवास काही देऊ शकत नसलो तर त्याच्याकडे आपल्याला काही मागण्याचा अधिकार तरी आहे काय? असा विचार करत देवदर्शन न घेताच त्या रांगेतून बाहेर जावे, असे त्यास वाटू लागले. तो देवालाच विचारू लागला, “देवा, माझ्याकडे तर काहीच नाही. मी तुला काय देऊ.’
त्यावर हलकेच देव त्याला म्हणाला, “हे बघ इतरांनी जे जे काही म्हणून मला देण्यासाठी आणलं आहे ना, ते सारं माझंच आहे. ते माझंच मला देतात आणि त्यांना मात्र जे हवं ते माझ्याकडून मागून घेतात. तू काही मागणार नाहीस कारण तुझ्याकडे देण्यासारखं काही नाही. होय ना? मग तू एक कर तू फक्त तुझं मन मला दे. तुझी आर्त भक्ती दे, श्रद्धा दे, विश्वास दे. त्या भक्तास देवाचं मागणं कळलं. त्याने रित्या हाताने पण भक्तीने परिपूर्ण भरलेल्या मनाने जेव्हा देवाच्या चरणावर माथा टेकला. तेव्हा न मागता पुजारी बुवांनी मात्र त्याची ओंजळ प्रसाद फळानी भरली.