भोपाळ – मध्य प्रदेशात भारतीय जनता पार्टीचा विजय झाला. मात्र हा विजय सोपा नव्हता. किंबहुना तो अशक्य असाच होता. त्याचे कारण गेली दोन दशके, मधले काही महिने सोडले तर तेथे भाजपचे सरकार होते. इतकी प्रदीर्घ काळ सत्ता असल्यावर नाराजी ही असतेच. त्यामुळे गेल्या वर्षभरात तर भाजप जाणारच, केवळ औपचारिकता बाकी आहे असे स्वच्छ दिसू लागले होते. तथापि, भाजपने सत्ता केवळ राखलीच नाही तर अभूतपूर्व असे यश मिळवले.
भाजपच्या या अनपेक्षित विजयामुळे अनेक जण बुचकळ्यात पडले आहेत. मात्र हा विजय लॉटरी नव्हती तर त्यामागे पक्षाने घेतलेले सुनियोजित कष्ट होते हेही आता समोर येते आहे. पक्षाच्या कालच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी अत्यंत जल्लोषात प्रदेशाध्यक्ष व्हि. डी. शर्मा यांची निवडणूक काढली. त्यानंतर शर्मा यांनी विजयाचे गुपित उघड करताना त्याचे संपूर्ण श्रेय पक्षाचे नेते अमित शहा यांना दिले आहे.
शर्मा म्हणाले, कॉंग्रेस पक्ष गेल्या वर्षभरापासूनच त्यांचा विजय झाला असल्याचे गृहीत धरून चालला होता. मात्र त्याचवेळी आम्ही आमचे कष्ट सुरू केले. पक्षाच्या तब्बल ४० लाख बूथ स्तरावरच्या कार्यकर्त्यांनी अमित शहा यांच्या सूचनांचे शब्दश: पालन केले. त्याचा हा परिणाम आहे. प्रदेशातील प्रत्येक मतदान केंद्रावर ५१ टक्के मतदान झालेच पाहिजे असे काम किंवा टास्क शहा यांनी दिली होती.
त्यानुसार आमच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण मध्य प्रदेशातील ६४,५२३ मतदान केंद्रांवर अथक मेहनत घेतली. त्यांच्या कष्टामुळेच आम्हाला आमचे लक्ष्य गाठता आले. जानेवारी २०२२ मध्येच पक्षाने किमान ९६ टक्के मतदारसंघांमध्ये बूथ समिती तयार करण्याच्या योजनेवर काम केले. कॉंग्रेसच्या विजयचे दावे केले जात असताना आम्ही गुपचूप बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांची एक सेना तयार केली. त्यासाठी आम्हाला किमान वर्षभराचा कालावधी लागला. मात्र त्यानंतर आज कॉंग्रेस शांत झाली आहे.