मुंबई – महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून राजकीय वातावरण पुन्हा तापायला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता या वादावर भाष्य केले आहे. गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राचे जावई असून सीमावादाचे सर्वाधिक चटके त्यांच्याच सासरवाडीला बसत असल्याचे राऊत यांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्र्यांची राज्यातील सत्ताधारी पक्षांचे नेते सीमावाद प्रकरणी भेट घेणार आहेत. याविषयी देखील राऊत यांनी माध्यमांशी बोलताना आपले मत मांडले.
“न्यायालय राम मंदिराचा प्रश्न सलग सुनावणी लावून सोडवू शकतं परंतु २० ते २५ लाख नागरिकांचा प्रश्न असलेल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी मात्र तारीख पे तारीख सुरु आहे.” असं राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले. मराठी भाषा,संस्कृती याबाबत अधिकारवाणीने आदेश देण्याचे अधिकार गृहमंत्र्यांना आहेत. गृहमंत्री जर खरंच मध्यस्थि करणार असतील त्यातून काही सकारात्मक बदल होणार असेल तर टीका करण्याचं काहीच कारण नाही असं राऊत यावेळी म्हणाले.
अमित शहा महाराष्ट्राचे जावई
अमित शहा महाराष्ट्राचे जावई आहेत. त्यांच्या पत्नी कोल्हापुरच्या आहेत. सीमाभागाचे सर्वाधिक चटके कोल्हापूरला बसतात, सर्वात मोठा संघर्ष कोल्हापूरला होतो. त्यामुळे या प्रश्नाबाबत त्यांना जास्त माहिती असेल असंही राऊत यावेळी म्हणाले. दोन्हही राज्यात भाजपची सत्ता आहे. बोम्मई म्हणतात गृहमंत्र्यांना भेटून काही फायदा नाही परंतु आम्ही म्हणतो फायदा आहे. सध्या बेळगाव,कारवार अशा अनेक गावांमध्ये कर्नाटकचे पोलीस धुडगूस घालताहेत. तेथील फौजफाटा मागे घेऊन कायदा सुरक्षेसाठी सेंट्रल फोर्स पाठवणं हे केंद्रीय गृहमंत्री करू शकतात अस स्पष्ट मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.