मुंबई – शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल मागील काही दिवसांपासून प्रलंबित आहे. यावरुन आता पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvkar) यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि त्यांच्या संरक्षणाखाली सुरू असलेलं घटनाबाह्य सरकार हे संविधान विरोधी आहे. सध्या चोर आणि लफंग्यांचे सरकार ते चालवत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, “शिवसेनेचे ४० आमदार आणि राष्ट्रवादीचेही तेवढेच आमदार हे मूळ घरातील चोरी, लूट करून गेलेत. त्या चोरांना, दरोडेखोरांना विधानसभेचे अध्यक्ष सार्वभौमत्वाच्या नावावर संरक्षण देत असतील तर राहुल नार्वेकरांचे नाव विधानसभा अध्यक्ष म्हणून या देशाच्या आणि राज्याच्या काळ्याकुट्ट इतिहासात नोंदवले जाईल. हे सरकार संविधानविरोधी, बेकायदेशीर आहे. चोर, लफंग्याचे सरकार चालवतायेत आणि त्यांना घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती संरक्षण देत असेल तर या देशात आणि राज्यात काय चाललंय याची कल्पना न केलेली बरी. वारंवार राहुल नार्वेकर विधानसभेचे अधिकारी, विधिमंडळाचे सार्वभौमत्व हे सांगताय, याचा अर्थ असा नाही की चोरी करून एखाद्याने दुसऱ्याच्या घरात शिरावे आणि त्या घरातील मालकाने त्या चोराला, खून्याला संरक्षण द्यावे अशी सार्वभौमत्वाची व्याख्या होत नाही.”
“महाराष्ट्राच्या रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल”
खासदार संजय राऊत म्हणाले की, “माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारीनंतर राहुल नार्वेकर हे नाव उद्या जेव्हा ते खुर्चीवर नसतील तेव्हा त्यांना महाराष्ट्राच्या रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल. या राज्यातील जनता माफ करणार नाही. तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. त्यांना फासावर लटकवायचे आदेश दिल्लीतून आले आहेत. सर्वोच्च न्यायालयातून फासावर लटकवायचे आदेश आलेले आहेत. सर्वोच्च न्यायालय शिक्षा सुनावतं पण फासावर लटकवण्यासाठी जल्लादाची गरज असते ही जबाबदारी आता विधानसभा अध्यक्षांवर आहे.”
पुढे ते म्हणाले, “नार्वेकर चोरांचे सरदार हे म्हणून काम करत आहेत की संविधानाचे रखवालदार म्हणून काम करत आहेत हे त्यांनी स्पष्ट करावे. चौकीदार चोर आहेत तसे संविधान पिठावर बसलेले चोर आहेत असं म्हणण्याची वेळ महाराष्ट्रावर येऊ नये. अगोदरच्या राजपाल आणि या विधानसभा अध्यक्षांनी इतक्या वेळा न्यायालयाचा अपमान केला आहे की त्यांना रोज न्यायालयाने फासावर लटकवले पाहिजे.”
“विधिमंडळाच्या अध्यक्षांनी आणि आधीच्या राज्यपालांनी न्यायालयाचा इतक्यांदा अपमान केला की न्यायालयाने यांना रोज फासावर लटकवायला हवे. विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालय वारंवार निर्णय देतंय. शिवसेनेच्या प्रकरणात एकनाथ शिंदेंनी बेकायदेशीरपणे व्हिप निवडला हे कोर्टाने म्हटलं आहे. तरीही आमचे विधानसभा अध्यक्ष निर्णय घेत नाही. टाइमपास करतायेत. कुठल्याही परिस्थितीत आमदारांना अपात्र ठरवावेच लागेल,” असे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले.