मुंबई : शिवसेना गटाच्या नेत्या सुषमा अंधारे हे त्यांच्या एका वक्तव्यामुळे अडचणीत सापडल्या आहेत. हिंदू देवीदेवतांबद्दल केलेल्या विधानामुळे सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी वारकरी संप्रदायाने केली आहे. तसेच ज्या पक्षात सुषमा अंधारे असतील त्या पक्षाला मतदान न करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे दिसत आहे.
राज्यात शिवसेनेच्या फुटीनंतर सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. विरोधकांवर आक्रमक पद्धतीने टीका केल्यामुळेच सुषमा अंधारे या सध्या चर्चेत आल्या आहेत. दरम्यान, त्यांनी हिंदू देवी-देवतांबद्दल केलेल्या विधानामुळे विश्व वारकरी सेनेने त्यांच्याविरोधात शपथ घेतली आहे.
विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी, पश्चिम बंगालच्या गंगासागर समुद्र किनाऱ्यावर शपथ घेत सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. मी आजपासून शपथ घेतो की, ज्या पक्षामध्ये सुषमा अंधारे राहतील त्या पक्षाला मतदान करणार नाही अशा प्रकाराचा शेटे यांचा व्हिडिओ समोर आला आहे. येत्या काळात महाराष्ट्रात अनेक वारकरी अशाप्रकारे शपथ घेतील असे शेटे यांनी सांगितले. त्यामुळे सुषमा अंधारे यांच्या विधानांमुळे ठाकरे गटाची गोची झाली आहे.
आळंदी येथे वारकऱ्यांनी सुषमा अंधारे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून त्यांचा निषेध केला. आळंदीचे युवा किर्तनकार महेश मडके पाटील यांच्या नेतृत्त्वात झालेल्या आंदोलनात वारकऱ्यांकडून अंधारे यांना उत्तर देण्यात आले. संतांबाबत बोलण्याआधी अभ्यास करा असा सल्ला वारकऱ्यांनी सुषमा अंधारेंना दिला.
तर तिकडे विदर्भातही सुषमा अंधारे यांच्या विरोधात वारकरी आक्रमक झाल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष दामुअण्णा महाराज शिंगणे यांनी सुषमा अंधारे यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियात सुषमा अंधारे यांचा हिंदू देवी-देवता आणि साधुसंताबद्दल वादग्रस्त विधानांची व्हिडिओ क्लीप व्हायरल होतेय. त्यामुळे वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. प्रभू राम, श्रीकृष्ण, संत ज्ञानदेव यांच्यावर अंधारे यांनी अवमानाजनक वक्तव्य केली आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.