मुंबई – शिवसेनेच्या दोन्ही गटातील नेत्यांकडून सतत आरोप-प्रत्यारोप सुरू असतात. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बाळासाहेबांनी ज्यांना विरोध केला त्या सगळ्यांसोबत ते युती करतील, असे म्हणत ठाकरे गटावर निशाणा साधला होता. यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांना समाजवाद हा शब्द तरी माहीत आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री मोदीमय झाल्याची टीका संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले की, “बाळासाहेबांनी कोणालाही दूर ठेवलं नाही. बाळासाहेब हे सर्व समावेशक होते. बाळासाहेब जेव्हा हयात होते तेव्हा एकनाथ शिंदे हे सेनेच्या मुख्य वर्तुळात कधीच नव्हते. मी बाळासाहेंबासोबत चाळीस वर्षे काम केले आहे त्यामुळे बाळासाहेब कोणाला दूर ठेवायचे हे माझ्याशिवाय कोणाला माहित असेल असं वाटत नाही.” तर पुढे समाजवादीच्या मुद्द्यावरून देखील संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
“संयुक्त महाराष्ट्राचा लढा, सीमाप्रश्नाचा लढा यासह अनेक प्रश्नांमध्ये समाजवादी पार्टी आणि शिवसेना एकत्र आले. मुख्यमंत्र्यांना समाजवाद हा शब्द तरी माहीत आहे का? मुख्यमंत्र्यांनी बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव ऐकले का हे विचारा. नानासाहेब गोरे त्यांना माहिती आहेत का? ज्या ठाण्यातून ते येतात तिथे सर्वात जास्त समाजवादी लोकं रहात होते आणि काम करत होते. भाजपच्या पदराखाली बसले आहेत त्यांना सत्ता देण्याचे काम हे समाजवादी नेत्यांनी दिले. महाराष्ट्र तोडण्याची भाषा कधी समाजवाद्यांनी केली नाही. ती संघ परिवाराने केली आणि ज्यांच्यासोबत तुम्ही आहात.”
“एकनाथ शिंदे यांनी महापालिकेचा रेकॉर्ड तपासावा ज्या पालिकेवर मराठी माणसाचा पुसून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. त्या मराठी पालिकेचा कारभार मराठीत भाषेत आणावा हा पहिला प्रस्ताव जॉर्ज फर्नांडिस यांनी आणला. तुम्ही आम्हला मिलावट राम म्हणतात तुमची सडलेली भेळपुरी झाली आहे तुम्ही आम्हाला समाजवाद काय शिकवणार?”, असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. याशिवाय मुख्यमंत्री हे शिवसेनेचे राहिले नाहीत ते मोदीमय झाले आहेत. भाजपचे लोक जेवढं मोदी -मोदी करत नाहीत तितकं अजित पवार आणि एकनाथ शिंदे करत आहेत, असेही संजय राऊतांनी म्हंटले आहे.