जत : शरद पवार यांनी राज्यासाठी काय केले याचा जाब विचारण्याची वेळ आली आहे. १५ वर्षाच्या सत्तेच्या काळात केलेल्या विकासकामांचा इहशेब पवारांनी द्यावा, असे आव्हान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीं आज जत येथे झालेल्या सभेत दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या विकासासाठी अहोरात्र झटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरक्षित भारत तयार केलाय तर फडणवीस विकसित महाराष्ट्र तयार करताहेत. फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री मी पाहिले नाहीत, रात्री 12 वाजता फोन आला की मला समजत की फडणवीस यांचा फोन असेल. सध्या महाराष्ट्राची पहिल्या क्रमांकाकडे वाटचाल सुरू आहे असंही ते म्हणाले.
ते म्हणाले, काँग्रेस राष्ट्रवादी ची अवस्था अतिशय वाईट आहे. 70 वर्षांच्या राजकारणात 370 कलम कुणी हटवलं नाही. 370 हटवून देशाला अखंड ठेवण्याचे काम मोदींनी केलं. सरदार पटेल यांचे स्वप्न साकार झालं. 370 हटवायला काँग्रेस राष्ट्रवादीने विरोध केला होता. 370 कलम हटविण्याबाबात तुमची काय भूमिका आहे ते शरद पवारांनी जाहीर करावं असं आव्हान त्यांनी दिले.
बालकोट हल्ला बाबत विरोधकांनी पुरावा मागून काय साध्य केलं असा सवाल त्यांनी केला. जेएनयूमध्ये भारताचे तुकडे करण्याच्या घोषणा देणाऱ्यांना जेल मध्ये पाठवायचं की नाही? राहुल गांधी यांनी आमच्यावर टीका करावी, पण देशाचे तुकडे करतो म्हणाऱ्यांना पाठिंबा देऊ नये. बांगलादेश जेव्हा निर्माण झाला तेव्हा इंदिरा गांधी यांचे पहिले अभिनंदन वाजपेयींनी केलं होतं याची आठवण अमित शहांनी करून दिली.