यवतमाळ : विरोधक अस्तित्वात आहेत कि नाही याची चिंता तुम्ही करू नका. तुम्ही पाच वर्षात काय काम केले? दिल्लीचे आदेश जशेच्या तसे लागू करणाऱ्या गुजरात धार्जिण्या सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
विरोधकच शिल्लक नसल्याने निवडणुकीत मजा येत नाही, अशी खिल्ली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडवली होती. त्याला पवार यांनी उत्तर दिले. विरोधकांचं राहू द्या… तुम्ही 5 वर्षात काय काम केलं हे सांगा, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.
शरद पवार महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज यवतमाळमध्ये सभा घेतली. दिल्लीतून आलेले निर्देश मुख्यमंत्री फडणवीस कोणताही विचार न करता जशाच्या तश्या महाराष्ट्रात लागू करतात. त्यांनी 5 वर्षे सत्तेच्या काळात किती उद्योग महाराष्ट्रात आणले? किती रोजगारांची निर्मिती केली? हे एकदा जाहीर करावं, असं आव्हान पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिलं.
महाराष्ट्रात कामगार बेरोजगार झालेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, महिलांवरच्या अन्याय अत्याचारात वाढ होतीये. म्हणून जनतेने महाआघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन शरद पवार यांनी केले.