कोलकाता – तृणमुल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर तसेच पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्यामागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाच हात आहे असा थेट आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
त्रिुपरात तृणमुल कॉंग्रेसचा पाया व्यापक करण्यावर सध्या पक्षातर्फे तेथे प्रयत्न हाती घेण्यात आले आहेत. त्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन त्रिपुरात केले जात आहे. अशाच एका कार्यक्रमाला निघालेल्या तृणमुलच्या कार्यकर्त्यांवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा प्रकार नुकताच घडला आहे त्या संबंधात ममतांनी हा आरोप केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की भाजपने आपली सत्ता असलेल्या त्रिपुरा, आसाम, उत्तरप्रदेश आणि अन्य ठिकाणी अराजक निर्माण केले आहे. त्रिपुरात त्याच भावनेतून आमच्या पक्ष कार्यकर्त्यांवर जो हल्ला झाला त्याचा आपण निषेध करतो असे त्यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे.
गृहमंत्री अमित शहा यांच्या पाठिंब्याशिवाय असा हल्ला होऊ शकत नाही. त्रिपुरा पोलिसांच्या समोर हा हल्ला झाला त्यामागे अमित शहा हेच आहेत. त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांनाहीं या प्रकाराची दखल घ्यावीशी वाटत नाही असेही ममतांनी म्हटले आहे.