पौड – दोन महिन्यांत तहसीलच्या कामात सुधारणा न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन योग्य ती कार्यवाही करू, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी मुळशी महसूलच्या अधिकाऱ्यांना दिला.
मुळशी तालुक्यातील विविध समस्यांबाबत पौड पंचायत समितीमधील सेनापती बापट सभागृहात झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी खासदा सुळे यांनी शासकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी महसूल विभागातील कार्यालयात कलम 155 च्या केसेस संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला.
तलाठी यांच्याकडून झालेल्या चुका नागरिकांना नाहक त्रास सहन करून तहसिल कार्यालय अर्ज करून दुरुस्त होण्यासाठी लागणार विलंब, यामुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान याबाबत प्रामुख्याने लक्ष घालून मार्ग काढण्यासाठी नागरिकांनी आग्रह धरण्यात आला. यावेळी सुळे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावून याबाबत तक्रार केली. 29 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत चर्चा केली जाणार आहे. त्यात पदाधिकाऱ्यांनी यावे, असे आवाहन सुळे यांनी यावेळी केले.
कोळवण खोऱ्यात सतत वीजपुरवठा खंडीत होत असल्याची तक्रार रविंद्र कंधारे, माऊली साठे, बबन धिडे, चेतन फाले, शरद केदारी यांनी केली. मुठा, पौड, कुंभेरी येथे वीजेचे सबस्टेशन करण्याची मागणी कोंढरे यांनी केली. यावेळी भूमीअभिलेख, पाणीपुरवठा, कृषी, ग्रामीण रूग्णालय, आरोग्य, शिक्षण, महिला बालकल्याण, समाजकल्याण, पशूसंवर्धन या विभागातील कामांचा आढावा घेतला.
या बैठकीत सुळे यांच्याबरोबर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, राजाभाऊ हगवणे, सविता दगडे, सुनील चांदेरे, प्रवीण शिंदे, शांताराम इंगवले, रविंद्र कधारे, राधिका कोंढरे, रूपाली ढोकळे, दगडूकाका करंजावणे, सागर साखरे, बाळासाहेब सणस, दिपाली कोकरे, सुनील वाडकर, माऊली कांबळे, लहू चव्हाण, राजेंद्र मारणे, प्रवीण धनवे गटविकास अधिकारी संदीप जठार, पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, निवासी नायब तहसिलदार श्रीकांत मिसाळ, भूमिअभिलेखचे अधिक्षक प्रताप चौधरी तसेच पंचायत समितीच्या विविध विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. तहसिलदार अभय चव्हाण, मुळशी प्रादेशिक नळपाणीपुरवठा, वनविभाग आणि एसटी विभागाचे अधिकारी मात्र अऩुपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना भेटणार
चांदणी चौकातून कोकणात जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट आणि निकृष्ट कामावरही मुळशीकरांनी नाराजी व्यक्त केली. गेली सात महिन्यांपासून दारवली, सुतारवाडी येथे रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे. काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. एमएसआरडीसीच्या दुर्लक्षामुळे अनेकांना अपघातात जीव गमवावा लागला. याबाबत केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या समस्या मांडू असे सुळे यांनी सांगितले.
‘त्या’ ठेकेदारांना काळ्या यादीत टाका
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिलाईच्या कामावरही अनेकांनी ताशेरे ओढले. बोतरवाडी फाटा ते उरवडे येथील रस्ता, पशूसंवर्धनचा दवाखाना दोन वर्षांपासून झुणका भाकर केंद्रात भरतोय, असे कंधारे यांनी सांगितले. वाळेणचा पूल धोकादायक असल्याची तक्रार शिवाजी साठे यांनी केली. रस्त्यांची कामे व्यवस्थित न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, अशी सूचना खासदार सुळे यांनी दिली.