कोलकाता – सरकारच्या विरोधात निषेध नोंदवताना विरोधकांचे ऐक्यही महत्वाचे असते असे मत नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी व्यक्त केले आहे. तथापी विरोधी पक्षांमध्ये एकमत झाले नाही तरी लोकांनी सरकारच्या विरोधातील निदर्शने सुरूच ठेवली पाहिजेत असेही त्यांनी म्हटले आहे. सध्या देशात सीएए, एनपीआर आणि एनआरसीच्या अनुषंगाने निदर्शने सुरू आहेत त्या अनुषंगाने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी वरील प्रतिपादन केले.
ते म्हणाले की राजकारण्यांमध्ये एखाद्या विषयावरून ऐक्य झाले नाही तरी लोकांना जे विषय महत्वाचे वाटतात त्या विषयी त्यांनी आपली निदर्शने आणि विरोध सुरूच ठेवला पाहिजे. तत्पुर्वी तेथे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात बोलताना ते म्हणाले की आपण ज्या गोष्टींच्या विरोधात निदर्शने किंवा विरोध करीत आहोत तो नेमका कशासाठी आहे हेही लोकांनी जाणून घेण्याची गरज आहे. केवळ भावनेच्या आधारावर एखाद्या बाबीला विरोध करता येणार नाही.
सरकारच्या विरोधात विरोध नोंदवताना त्यामागे निश्चीत विचारही असला पाहिजे म्हणजेच डोके ताळ्यावर ठेऊनच विरोधासाठी रस्त्यावर उतरावे लागेल असे ते म्हणाले. घटना आणि मानवाधिकाराच्या बाबतीत जर सरकारकडून एखादी मोठी चुक झाली असेल तर त्याच्या विरोधात लोकांनी निषेध नोंदवणे अत्यावश्यक ठरते. मोदी सरकारने आणलेला नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करण्याची जाहीर मागणीही सेन यांनी केली आहे.