लाहोर : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील मास्टर माईंड हाफिझ सईद याने “टेरर फंडिंग’च्या दोन प्रकरणांमध्ये दोषी नसल्याचा दावा पाकिस्तानातील दहशतवाद विरोधी न्यायालयामध्ये केला आहे.
“जमात उद दावा’ या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढायला लागला असताना सईदचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे.
दहशतवाद विरोधी विभागाने सईद आणि त्याच्या सहकाऱ्यांच्याविरोधात पंजाब प्रांतातील वेगवेगळ्या शहरात 23 “एफआयआर’ दाखल केल्या असून सईदला 17 जुलै रोजी अटक करण्यात आली असून लाहोरमधील कोट लखपत तुरुंगात ठेवले गेले आहे.
सईदने आपल्यावरील सर्व आरोप फेताळले असून या प्रकरणाची सुनावणी अंतिम युक्तीवादासाठी बुधवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी सईदच्या नेतृत्वाखालील “जमात उद दावा’ ही आघाडीची संस्था असल्याचे मानले जाते.
लष्कर-ए-तोयबाने 2008 साली मुंबईवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 166 जण मृत्यूमुखी पडले होते.