इंदापूर, दौंडच्या दौऱ्यात सुळेंचीही टीका टिप्पणी नाही
राहू – भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरच पवार यांच्या बालेकिल्ल्यातच आक्रमण केले आहे, असे असताना पवार एवढे शांत का? हे अनेक राजकीय विश्लेषकांना व विशेष करून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पचनी पडायला तयार नाही. त्यामुळे “सांगताही येईना, सहनही होईना…’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
केंद्र पातळीवरून 2019 मध्ये ज्या लोकसभा मतदारसंघात भाजपाला अपयश आले, त्या लोकसभा मतदारसंघाबाबत आतापासूनच तयारी सुरू केली असून त्याची अंमलबजावणी देखील सुरू आहे. त्यामध्ये महत्त्वाच्या मतदारसंघाबाबत केंद्रीय मंत्र्यांवर जवाबदारी सोपविलेली आहे. या महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ हा भाजपाच्या केंद्रस्थानी आहे. या मतदारसंघासाठी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या वजनदार मंत्र्यांकडे जवाबदारी दिली आहे, व या संदर्भातीला त्यांचा दौरा हा नुकताच पार पडला.
बालेकिल्ल्यात पवारांना शह देण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपाने जास्त लक्ष दिले आहे. भाजपाचे नवनिर्वाचित प्रदेशअध्यक्ष असतील किंवा ज्यांच्याकडे या मतदार संघाची जवाबदारी दिली असेल, अशा अनेक तालुका व जिल्हा पातळीवरील नेत्यांनी राष्ट्रवादी विरोधात वातावरण तयार करण्याचे काम सुरू केले आहे; परंतु याला राष्ट्रवादीने जास्त महत्व दिलेले दिसत नाही.
नाही म्हणायला खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर व दौंडचा धावता दौरा केला होता; परंतु या दौऱ्यात देखील त्यांनी जास्त राजकीय टीका टिप्पणी केल्याचे दिसत नाही. म्हणजे केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन यांच्या दौऱ्याकडे राष्ट्रवादीने जास्त गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. नेमकी हीच बाब राजकीय विश्लेषक व भाजपाच्या वरिष्ठ फळीला रुचत नाही. अर्थात ते या बाबत उघड बोलणार नाही, तो भाग वेगळा.
त्याचा अंदाज करणेही कठीण
शरद पवार यांची राजकीय कारकीर्द पहिली तर ते ज्या गोष्टीला जास्त महत्त्व देत नाही ती गोष्ट ते हमखास आपल्यासारखी करून घेत असतात, त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत जोपर्यंत पवार काही वक्तव्य करत नाही तोपर्यंत विरोधकांच्या दौऱ्याला धार मिळू शकत नाही. ही धार येण्याची वाट पाहता-पाहता शरद पवार हे काय खेळी करतील व सगळीच बारी पलटवून टाकतील, त्याचा अंदाज करणे हे कठीण काम आहे..
जानकर भाजपातील वैचारिक अंतर वाढले?
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी भाजपा जोरदार तयारी करत असताना त्यांचाच सहयोगी सदस्य असलेल्या पक्ष म्हणजे राष्ट्रीय समाज पक्ष्याने बारामती लोकसभा मतदार संघावर आपला दावा केला आहे. संपूर्ण बारामती लोकसभा मतदार संघात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकत ही मोठी आहे. मागील लोकसभेच्या निवडणुकीत महादेव जानकर यांनी मोठ्याप्रमाणात मतदान मिळविले होते. त्यामुळे त्यांच्या दाव्यामुळे भाजपाची अडचण निश्चितच वाढू शकते. तसेच रासप हा जरी भाजपाचा सहयोगी पक्ष असला तरी भाजपाशी वाढलेले वैचारिक अंतर व राष्ट्रवादीच्या विरोधातील झालेली बोथट धार यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे पवारांचे मौन हे अनेक चर्चांना जन्म देणारे ठरू शकते, एवढे मात्र निश्चित!