विद्यार्थ्यांनी प्रामाणिक राहणे आवश्यक आहे. वेळेचा योग्य पद्धतीने सदुपयोग करून खूप अभ्यास करा, अवांतर वाचन वाढवा, पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान गरजेचे आहे. त्याबरोबर विद्यार्थ्यांनी आतापासून नेतृत्व गुण अंगिकारले पाहिजेत व संभाषण कौशल्य वाढविले पाहिजे, असे मत दैनिक प्रभातचे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी वेळेचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. आपल्याला पुढे काय करायचे याचे योग्य नियोजन करणे आजच्या स्पर्धेच्या युगात गरजेचे झाले आहे. दररोज व्यायाम करा, योग्य आहार घ्या, शरीर चांगले व निरोगी असेल तर भविष्यात केलेल्या प्रगतीचा आनंद मिळविता येतो. खूप पैसा, संपत्ती मिळाल्याने माणूस आनंदी राहतोच असे नाही. आज अनेक जण कोट्यधीश असले, तरी समाधानी व आनंदी नाहीत.
पण दैनिक प्रभातचे व्यवस्थापकीय संचालक आनंद गांधी व दिशा परिवाराचे कार्याध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी मात्र आनंद शोधला, तो गरजू हुशार विद्यार्थ्यांना मदत करून. दुसऱ्याला मदतीचा हात देण्यात जो आनंद असतो, तो अन्य कोणत्याही आनंदापेक्षा श्रेष्ठ आहे. आनंद कशामध्ये मिळतो हेदेखील महत्त्वाचे आहे. दुसऱ्याला दिलेल्या मदतीतून खऱ्या अर्थाने आनंद मिळतो. त्यामुळे आपल्याला जशी मदत झाली, तशी मदत भविष्यात आपणही गरजू विद्यार्थ्यांना करणे गरजेचे आहे. अशोक गांधी चॅरिटेबल ट्रस्ट व “दैनिक प्रभात’तर्फे “मदत मागून तर बघा’ या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. त्यातून अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिल्याने त्यांचे शिक्षण पूर्ण होत असल्याचा सार्थ अभिमान वाटतो, असे स्वामी म्हणाले.