दिशा परिवार गेल्या 16 वर्षांपासून शिक्षणक्षेत्रामध्ये काम करत आहे. विद्यार्थी ही जात आणि शिक्षण हा धर्म मानून संस्था काम करत आहे. संस्थेने आतापर्यंत महाराष्ट्रातील पाच हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मदत केली. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. विद्यार्थी घडावा, त्याचे कुटुंब उभे राहावे आणि समाजाप्रती त्याचे असणारे कर्तव्य पूर्ण करावे एवढीच अपेक्षा संस्था त्यांच्याकडून ठेवते. काही विद्यार्थी ती पूर्ण करतात, तर काही विद्यार्थी यामध्ये कमी पडतात, अशी खंत दिशा परिवाराचे कार्याध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी व्यक्त केली.
गरजू विद्यार्थ्यांना दिशा परिवार आर्थिक मदत करीत आहे. त्यातून संस्थेची एवढीच माफक अपेक्षा आहे की त्यांनी खूप शिकावे व मोठे व्हावे. आपल्याला ज्या प्रमाणे मदत झाली, ते ऋण न विसरता हातात पैसा आल्यानंतर दुसऱ्याला मदत करण्याची जाणीव ठेवावी. दैनिक “प्रभात’ने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलला असून, 80 विद्यार्थी दत्तक घेतले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना दैनिक
प्रभातने 17 लाख रुपयांची मदत केली आहे. त्यात नगर जिल्ह्यातील 45 विद्यार्थ्यांना समावेश असून ही मुले दत्तक घेऊन त्यांना शैक्षणिक खर्च दिला जात आहे.