नवी दिल्ली – उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या १० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे ८ तर समाजवादी पक्षाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. समाजवादी पक्षाच्या काही आमदारांनी क्रॉस वोटींग केल्यामुळे या पक्षाचे तिसरे उमेदवार आलोक रंजन यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला. आता या पराभवाच्या संदर्भातील आपली एक प्रतिक्रिया आलोक रंजन यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.
माजी मुख्य सचिव असलेले आलोक रंजन म्हणतात की आम्ही अपेक्षा केली होती तशी ही निवडणूक झाली नाही. तथापि, राज्यसभा निवडणुकीचा हा प्रवास मला अविश्वनीय पध्दतीने समृध्द करणारा होता.
सगळ्यांत महत्वाचे म्हणजे राज्यसभेसाठी माझ्या नावाचा विचार होणे ही सन्मानाची बाब होती आणि ते मी कायम लक्षात ठेवेन. त्यांनी याकरता सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे आभारही मानले आहेत. तुमचे समर्थन, प्रोत्साहन आणि विश्वास ही माझी मोठी ताकद असल्याचे त्यांनी अखिलेश यांना उद्देशून म्हटले आहे.
ते पुढे म्हणतात की राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी ही निवडणूक नव्हती. ती आमची मूल्ये, चांगल्या समाजाकरता असलेला आमचा दृष्टीकोन आणि सेवा करण्याची कटिबध्दता कायम राहावी यासाठी ही निवडणूक होती. आपले हे आदर्श बदलणार नाहीत. राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात योगदान देण्याचा माझा संकल्प आता अधिक दृढ होत जाईल.