- खरीप हंगामाची तयारी : सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांची धावपळ
पवनानगर – पवनमावळ परिसरात नदीच्या पाण्यावरील भात पेरणी करणास काही शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. पवना धरण परिसरातील ज्या ठिकाणी शेतीसाठी सिंचन सुविधा आहे, त्या ठिकाणी भाताची पेरणी शेतकरी करीत आहे. हवामान खात्याने मान्सून केरळमध्ये 1 जूनला दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. तसेच 8 जूनला महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला असल्याने भात पेरणीच्या कामासाठी शेतकरी लगबग करू लागले आहे.
पवनमावळात काही ठिकाणी धुळवाफेवरील पेरणीचे कामे सुरू आहे. आठवड्याभरापूर्वी अवकाळी पाऊस झाला. आता आणखी एका पावसाची प्रतीक्षा असून, त्यानंतर पेरणी करणार असल्याने शेतकरी एका पावसाची वाट पाहात आहेत. मावळ तालुका भातासाठी प्रसिद्ध आहे. येथे इंद्रायणी या भाताचे उत्पादन घेतले जाते. अलीकडे फुले समृद्धी हा वाणही भातउत्पादकांना आकर्षित करू लागला आहे. मुख्यत्वे मावळात फुले समृद्धी, पार्वती, सोनम, तृप्ती, साईराम व परिसरातील वाण पेरणीसाठी शेतकरी वापरतात.
दुसरीकडे आंबेमोहर हा पारंपरिक वाण मावळातून हद्दपार होतो की काय अशी स्थिती आहे. तुलनेने कमी उत्पादन मिळत असल्याने या वाणाचे उत्पादन फार कमी शेतकरी घेत आहेत. शासनाचा कृषी विभाग खरीप हंगामासाठी सज्ज झाला आहे. शेतकऱ्यांना विविध उपक्रमांद्वारे मार्गदर्शन केले जात आहे. भात पीक आधुनिक पद्धतीने लावण्यासाठी कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिर, शेतीशाळा घेण्यात येत आहेत. भात बियाणां बाबतही मार्गदर्शन करण्यात येत आहे.
बीजप्रक्रियापासून पेरणी, लागवडीपर्यंतचे मार्गदर्शन करण्यात येत आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी दिली.
गतवर्षी चांगला पाऊस झाला हवामानानेही चांगली साथ दिली. त्यामुळे भाताचे उत्पादन चांगले झाले होते. यावर्षीही मान्सूनचे आगमन वेळेवर होणार असल्याचा आणि सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. भातलागवडीस विलंब होऊ नये म्हणून काही शेतकरी त्यामुळेच भात पेरणीची लगबग करीत असल्याचे चित्र पवनमावळमध्ये दिसत आहे.
यांत्रिकीकरणाच्या जोडीने भातरोपांची नर्सरी
यंदा यांत्रिकीकरणाच्या जोडीने भातरोपांची नर्सरी करण्याकडे शेतकऱ्यांचा भर दिसतो. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत यावर्षी ही भात लावगडीची प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे. साधारण 75 एकराचा लक्षांक आहे. साधारणता मावळ तालुक्यामध्ये दरवर्षीप्रमाणे दीडशे एकरामध्ये यंत्राद्वारे भात लागवडीचे नियोजन केले आहे. त्यासाठी एकरी प्रत्येक शेतकऱ्याला चार हजार रुपये अनुदान देण्यात येते, हे अनुदान भात लागवड झाल्यावर “डीबीटी’द्वारे शेतकऱ्याच्या खात्यात जमा होते. एका एकरासाठी चार हजार रुपये त्यातील दोन हजार नर्सरी तयार करण्यासाठी व दोन हजार लागवड भाडे अशा स्वरुपात लागवड झाल्यावर देण्यात येते.
आधुनिक यंत्राचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात साधारणतः 15 ते 20 टक्के वाढ होते. यासाठी फक्त तीन ते चार मजुरांमध्ये भात लागवड होते. यामुळे मजुरांचा ही खर्च वाचला जातो. पेरणीसाठी एक एकरसाठी फक्त 15 ते 16 किलो बियाण्यात लागवड होते.
– राहुल घोगरे, तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) कृषी विभाग, मावळ.