जयपूर – कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या राजस्थानमधील सर्व मंत्र्यांनी शनिवारी राजीनामे दिले. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळात व्यापक फेरबदलांचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्याच (रविवार) नव्या मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
राजस्थानमध्ये मागील वर्षी तरूण नेते सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावले. त्यामुळे राज्य सरकार अडचणीत आले. मात्र, कॉंग्रेस श्रेष्ठींना पायलट आणि समर्थकांची मनधरणी करण्यात यश आल्याने पेच मिटला. त्यानंतर सर्व काही आलबेल झाल्याने पायलट समर्थकांना मंत्रिमंडळात सामावून घेण्याच्या मागणीने काही महिन्यांपासून जोर धरला. त्यातून मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाच्या चर्चा सुरू झाल्या. त्यापार्श्वभूमीवर, गेहलोत यांच्या निवासस्थानी 21 सदस्यीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यामध्ये सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले.
राजस्थानात मुख्यमंत्र्यांसह 30 मंत्री नेमले जाऊ शकतात. आता उद्या गेहलोत आणि कॉंग्रेस प्रभारी अजय माकन यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक होणार आहे. त्या बैठकीत नवे मंत्रिमंडळ निश्चित होणार असल्याचे समजते. बंडामुळे पायलट यांना उपमुख्यमंत्रिपद गमवावे लागले. त्यांच्याबाबत काय निर्णय होणार याविषयी मोठी उत्सुकता आहे.