पुणे – महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (विद्या प्राधिकरण) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी राज्य अभ्यासक्रम आराखड्याचा (पायाभूत स्तर) मसुदा जाहीर केला. यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येणार आहे. बालके त्यांच्या भाषेत वेगाने आणि सखोलपणे संकल्पना शिकत असल्याने मातृभाषाही शिक्षणासाठी महत्त्वाची ठरते.
शालेय शिक्षणाचा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा प्रसिद्ध केल्यानंतर राज्याच्या अभ्यासक्रम आराखड्याकडे लक्ष लागले होते. शिक्षणाच्या प्रक्रियेत पूर्वप्राथमिक शिक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळे या मसुद्यात 0 ते 8 वर्षांच्या बालकांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने मार्गदर्शक तत्त्वे सांगण्यात आली आहेत. मसुद्यात 340 पानांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यात अभ्यासक्रमाची ध्येये, भाषा आणि साक्षरतेबाबत दृष्टिकोन, अध्यापनशास्त्राची तत्त्वे, खेळातून शिक्षण, साक्षरता आणि संख्याज्ञान, अध्ययन अध्यापन साहित्य, अध्ययन वातावरण, मूल्यांकन अशा घटकांचा समावेश आहे.
या मसुद्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची तत्त्वे नमूद करण्यात आली असून, अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत. या मसुद्यात 2025 पर्यत 3 ते 8 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला सुरक्षित, मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबाबत महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. त्यासोबतच प्रारंभिक बाल्यावस्थेतील संगोपनालाही महत्त्व देण्यात आले आहे.
राज्य, राष्ट्र आणि जागतिक पातळीवरील प्रारंभिक संशोधन, शिक्षण क्षेत्राचा विस्तार, पायाभूत स्तरावरील बालकांचे शिक्षण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील पूर्व प्राथमिक स्तरासाठीची उद्दिष्ट्ये, क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती, अशा मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. प्राथमिक शाळेत नावनोंदणी वाढली असली तरी बालसंगोपन, बालशिक्षण कार्यक्रमातील नावनोंदणी अजूनही कमी आहे. अंगणवाड्यांची व्यापकता असूनही पूर्व प्राथमिक शिक्षणातील नोंदणी कमी आहे.
सन 2021-22 मध्ये राज्यातील शासकीय आणि खासगी अनुदानित शाळेत इयत्ता पहिलीमधील प्रवेशित 12 लाख 33 हजार 480 विद्यार्थ्यांपैकी केवळ 68.44 टक्के विद्यार्थ्यांना पूर्वप्राथमिक शिक्षणाचा अनुभव होता. सन 2019-20 मध्ये शहरी भागातील 55.9 टक्के मुले तर ग्रामीण भागात 64.44 टक्के मुले याप्रमाणे दोन ते चार वर्ष वयोगटातील सरासरी 60.5 टक्के मुले पूर्वप्राथमिक शाळेत जात असल्याची माहिती मसुद्यात नमूद करण्यात आलेली आहे.
अभिप्रायासाठी 27 ऑक्टोबरपर्यंत मुदत
राज्य अभ्यासक्रम आराखड्यातील मसुदा तज्ञांमार्फत विद्या प्राधिकरण स्तरावर तयार करण्यात आला असून यावर सर्व समाज घटक, शिक्षक, पालक, शिक्षण तज्ज्ञ, शैक्षणिक प्रशासक आदींकडून अभिप्राय मागविण्यात आले आहेत. त्यासाठी 27 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे.