निरा-देवघर पाणी वाटपाच्या निर्णयाचा निषेध
फलटण – निरा देवघर धरणातील पाणी वाटपाबाबत राज्यमंत्रीमंडळानी घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ शनिवारी सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय संघटना व सामाजिक संघटनांच्यावतीने ऍड. नरसिंह निकम यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
येथील नाना पाटील चौकातील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला मोर्चेकऱ्यांच्या वतीने पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चा छत्रपती शिवाजी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महावीर स्तंभ, डेक्कन चौक, म. फुले चौक, श्रीमंत मालोजीराजे पुतळा मार्गाने अधिकार गृहासमोर आला. यावेळी झालेल्या सभेत फलटण तालुका संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष ऍड. नरसिंह निकम म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रीमंडळाने निरा देवघर धरणातील पाणी वाटपाचा घेतलेला निर्णय उजव्या कालव्याअंतर्गत पाच तालुक्यावर अन्याय करणारा आहे.
धरणातील एकूण पाण्यापैकी 55 टक्के पाणी बारामती इंदापूर या दोन तालुक्यांना तर ज्यांच्यासाठी धरण काढले, ज्यांनी कालव्यासाठी आपल्या जमिनी दिल्या, ज्यांचा या पाण्यावर हक्क आहे, त्या खंडाळा, फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर या पाच तालुक्यांना 45 टक्के पाणी वाटप करून त्यांच्यावर सरकारने अन्याय केला आहे. खंडाळा तालुक्यातील 57 गावे, फलटणमधील 51 गावे, माळशिरस मधील 16 अशा या तीन तालुक्यातील 124 गांवासाठीच हे धरण बांधण्याचे प्रयोजन होते. या सर्व गावातील जनतेचा या धरणातील पाण्यावर कायदेशीर हक्क व अधिकार आहे. धरणाचे काम 2000 साली पूर्ण झाले.
12 टीएमसी पाणीसाठा साठवण झाला. तत्कालीन आघाडी सरकारने कालव्याची कामे न करता डाव्या कालव्याद्वारे पाण्याचा वापर केला. ज्यांच्यासाठी धरण त्यांना पाण्यापासून दुर्लक्षित ठेवले, आजही तिच परिस्थीती असल्याचे ऍड. निकम यांनी निदर्शनास आणून दिले. यानंतर मोर्चकऱ्यांच्यावतीने प्रभारी तहसिलदार पाटील यांना निवेदन देण्यात आले. निषेध मोर्चात नगरसेवक अशोक जाधव, सचिन अहिवळे, डॉ. प्रवीण आगवणे, पिंटु इवरे, सुशांत निंबाळकर, संभाजी कुंभार, राजेंद्र निंबाळकर, बजरंग गावडे, महादेव पोकळे, अशोक भोसले, राजेश हेंद्रे, मोहन रणवरे, यांच्यासह विविध सामाजिक, राजकीय संघटना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.