नीरा -नीरा मोरगाव रस्त्यावरील नीरा-गुळुंचे गावांमधील भागात डांबरीकरण करण्याच्या कामाला सुरूवात केली आहे. बारामतीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डांबरीकरण करण्यात येत आहे. परंतु संपूर्ण रस्ता डांबरीकरण करण्याच्या मागणीवर बारामती प्रांताधिकारी यांच्याकडे फौजदारी संहिता कलम 133 अन्वये दाखल याचिकेची सुनावणी पूर्ण होऊन दोन महिने होत आले आहेत. यावर अद्यापही निकाल देण्यास बारामती प्रांत कार्यालयाकडून दिरंगाई सुरू आहे.
नीरा- गुळुंचे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असते. रस्त्याची वारंवार मलमपट्टी करूनही त्यानंतर चार महिन्यांत रस्ता खड्डेमय होतो. नीरा डाव्या कालव्यावरील पूल वाहतुकीला बंद करून तीन वर्षे उलटून गेली आहेत. तरीही हा पूल काढला नाही. त्यामुळे बांधकाम खात्याविरोधात नरवीर राजे उमाजी नाईक सामाजिक विकास ट्रस्टचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी 133 अंतर्गत याचिका दाखल केली होती. याचिकेच्या सुनावणीसाठी दोनदा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना नोटीस काढली होती. तरीही एकही सुनावणीस बांधकाम विभागाचे अधिकारी हजर राहिले नाहीत. सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली असून चव्हाण व इतर सामाजिक कार्यकर्ते अद्यापही निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.
दुसरीकडे शासनाची भारतमाला योजना पूर्णपणे बारगळली आहे. योजनेत मोरगाव-नीरा रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार होते. परंतु यावर दीड वर्षांत काहीही कार्यवाही झाली नाही. डाव्या कालव्याच्या पुलावरील रस्त्यावर अपघात होऊन गुळुंचे येथील दोन जणांचा बळी गेला आहे. सद्यस्थितीत रस्ता पुन्हा खड्डेमय होत आहे. केवळ तात्पुरती मलमपट्टी करून भागणारे नसल्याने संपूर्ण रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी जोर धरत आहे. चार किलोमीटरचे टप्या- टप्प्यावर काम करण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली.
उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सूत्रे हातात घेताच आपल्या कामाची चुणूक दाखवायला सुरूवात केली आहे. रस्त्याचे काम प्रस्तावित केले असून याला यंदाच्या अर्थसंकल्पात मान्यता मिळाल्यास मोरगाव ते नीरा रस्त्याचे 7 मीटर रुंदीकरण होण्याची शक्यता आहे. रस्त्याचे काम दर्जेदार आवश्यक आहे.
तितकेच ते लवकर सुरू होणे गरजेचे आहे. अडथळामुक्त व सुरक्षित प्रवास करता येणे हा प्रवाश्यांचा न्याय हक्क आहे. बांधकाम विभागाकडे नेहमीच दुर्लक्ष करताना दिसतो. यासाठी मी यापूर्वी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या पुढे उपोषण केलेले आहे.
-अक्षय निगडे, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, पुरंदर.