पुणे – राज्य शासनाने महापरीक्षा पोर्टल बंद करण्याऐवजी त्यांतर्गत विभागस्तरावर परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे, तो पूर्णपणे चुकीचा आहे. राज्य शासनाने सर्व परीक्षा “एमपीएससी’द्वारे घेण्यात यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी केली आहे.
राज्य शासनाने महापरीक्षा पोर्टल बंद करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, केवळ कार्यपद्धतीत बदल केला आहे. त्यावरून उमेदवारांची मोठी निराशा झाली आहे. हा निर्णय युवकांच्या भविष्यासाठी हानीकारक आहे. परीक्षेत पारदर्शकता येण्यासाठी सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात यावी, अशी मागणी एमपीएससी स्टुडंट राईट्सचे महेश बडे व किरण निंभोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
महापोर्टल कायमस्वरूपी बंद न करता त्रयस्थ यंत्रणेद्वारे ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हा निर्णय पूर्णत: चुकीचा आहे. त्यामुळे राज्य शासनाने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.