रेल्वे पोलिसांकडून सुरक्षाच नाही
लोणी काळभोर – पुणे-दौंड रेल्वे मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे लोकल आणि एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये अनेकवेळा बाचाबाचीचे प्रकार घडत आहे. गेल्या आठवड्यात याच वादातून एकाचा खून झाल्यामुळे प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.
पुणे- दौंड मार्गावर दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या सुमारे सात ते आठ हजार आहे. यात चाकरमानी, व्यापारी, उद्योजक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सकाळी सातपासून ते रात्री अकरापर्यंत गर्दी असते. तसेच, सकाळी आणि सायंकाळच्यावेळी शासकीय आणि निमशासकीय कार्यालये सुटल्यानंतर गर्दी वाढते. यात अनेकवेळा प्रवाशांना तासभर उभा राहून प्रवास करावा लागत आहे.
गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पुणे- दौंडदरम्यान गर्दी वाढत असल्यामुळे प्रवाशांमध्ये बाचाबाची होत आहे. बाकावर बसण्यावरून वाद होत आहेत. यात दररोज प्रवास करणाऱ्यांकडून हा वाद मिटविला जातो. तसेच काही वेळा हा वाद हातघाईवर येत आहे. त्यामुळे गर्दीत दाटीवाटीने प्रवास करताना सर्वसामान्य नागरिक आणि महिलांचा जीव गुदमरून जात आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.