कोपरगाव – शहरातील नगर-मनमाड महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाल्याने नागरिकांवर पावसात भिजत रस्त्यावर उभे राहण्याची वेळ आली. पुणतांबा चौफुली ते टाकळी फाटा दरम्यान आज जड वाहनांसह छोट्या-मोठ्या वाहनांची कोंडी झाल्याने रहदारी ठप्प झाली होती.
तब्बल दोन-तीन तास ही वाहतूक ठप्प झाली होती.
रात्री उशिरापर्यंत वाहतुकीची कोंडी फोडण्याचा प्रयत्न पोलीस करीत होते. शहरामध्ये गोदावरीला आलेल्या पुरामुळे छोट्या पुलाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे या पुलाच्या डागडुजीचे काम नगरपालिकेतर्फे सुरू होते. त्यामुळे तो वाहतुकीसाठी बंद होता. त्यामुळे शहरासह महामार्गावरील वाहतूक साईबाबा कॉर्नर वरून मोठ्या पुलाच्या दिशेने वळवण्यात आली. एकाच वेळी मोठ्या प्रमाणे वाहने रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली.
आज दिवसभर रिमझिम पाऊस सुरू असल्याने वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनचालकांना पावसात भिजत उभे राहावे लागले. महिला, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पुराच्या पाण्याने मेटाकुटीला आलेल्या नागरिकांना पुन्हा वाहतूक कोंडीच्या संकटाचा सामना करावा लागला. पोलीस प्रशासनाने योग्य उपाययोजना न केल्याने वाहतूक कोंडीमुळे तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र दिवसभर वाहतूक पोलीस फिरकलेच नाहीत. चिखलमय झालेला रस्ता, साचलेली पाण्याची डबकी यातून वाहनचालकांना रस्ता काढावा लागत होत. रात्री नऊ वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू होते.