मुंबई – जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कानशिलात लगावण्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. यावरून संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. ठिकठिकाणी शिवसैनिकांकडून राणे यांचे पुतळे जाळले जात आहेत. याप्रकरणी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण भाजप राणे यांच्या पाठीशी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जे वक्तव्य केले यामुळे वाद निर्माण झाला आहे. माझ्या मते बोलण्याच्या भरात त्यांच्याकडून वाक्य निघून गेले असावे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे. तसेच राणे यांचे वक्तव्य समर्थनीय नाही मात्र संपूर्ण भाजप त्यांच्या पाठीशी आहे, असे फडणवीस पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणे यांना अटक केली आहे. राणेंविरोधात नाशिक आणि पुण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे राणेंनी रत्नागिरी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक राणेंच्या घरी पोहोचले आणि त्यांना अटक केली.