मुंबई – संगमेश्वर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील वक्तव्य केल्या प्रकरणी अखेर केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना भोवले आहे. राणे यांना अखेर रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. मात्र त्याच्या जीवाला धोका असल्याचा दावा भाजपनेते प्रसाद लाड यांनी केला. ते माध्यमांशी बोलत होते.
नारायण राणे हे केंद्रीयमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. मात्र अटक करतेवेळी राणे यांना धक्काबुक्की करण्यात आली. राणे जेवत असताना त्याच्या हातातील जेवणाचं ताट होतं. त्यावेळी त्यांना खेचण्यात आल्याचा दावा प्रसाद लाड यांनी केला आहे. राणे यांच्या जीवाला धोका असल्याचा आरोपही लाड यांनी केला आहे.
पोलिसांनी वैद्यकीय पथकाला राणे यांची तपासणी करू दिली नाही. राज्यात हुकूमशाही सुरू आहे का, असा प्रश्न लाड यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी राणेंविरोधात नाशिक आणि पुण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे राणेंनी रत्नागिरी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक राणेंच्या घरी पोहोचले.