पुणे-सातारा महामार्गाच्या अर्धवट कामाबाबत सरकारी अधिकाऱ्यांना इशारा
कापूरहोळ – पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील कामाच्या दिरंगाईस प्रशासन व ठेकेदार जबाबदार आहेत, असा आरोप करीत सरकारी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावाने कांगावा करू नये, अन्यथा शिंदवाडी ते साताऱ्यापर्यंत शेतकरी रस्त्यावर उतरतील असा इशारा महामार्गबाधीत शेतकऱ्यांनी
दिला आहे.
पुणे-सातारा महामार्गाचे काम गेल्या दहा वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. परंतु, काही गावातील शेतकरी या कामाच्या आड येत असल्याचा दावा सरकारी अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. शेतकरी भूसंपादनाची अधिकची नुकसान भरपाई मागत असल्याचे सांगितले जात असले तरी कितीतरी शेकऱ्यांना नुकसान भरपाईच मिळालेली नाही. रस्ता रुंदीकरणासाठी भूमिसंपादन अधिकाऱ्यांनी आवश्यक क्षेत्र ताब्यात घेतले आहे.
संबंधीत नागरिकांनीही आपापल्या जागा मोकळ्या करून दिलेल्या आहेत. परंतु, रस्त्याचे काम पूर्ण करण्यात प्रशासन उशीर करीत आहे. केळवडे येथील मंदिराचे काम पूर्ण होऊन मंदिरामध्ये देवीची स्थापनाही झाली आहे, असे असताना सुद्धा जुने मंदीर हटविण्याकामी आता प्रशासनच दिरंगाई करीत आहे. यासह महामार्गालगत शेकडो वर्षांची जुनी झाडे तोडण्यासाठी शेतकऱ्यांनी हरकती घेतल्याचा कांगावा प्रशासन तसेच ठेकेदार कंपनीकडून केला होता. झाडे तोडण्यात आल्यानंतरही पुणे-सातारा महामार्ग रुंदीकरण करताना सेवा रस्त्याचे (सर्व्हिस रस्ता) काम जागोजागी अर्धवट सोडून दिलेले आहे.
रस्ता नाही तर सेवा रस्त्याची कामे का नाही पूर्ण झाली, असा सवालही शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जावू लागला आहे. महामार्गाच्या कामाला शेतकऱ्यांकडून कोठेही अडवणूक होत नसताना केवळ शेतकऱ्यांमागे लपण्याचा प्रयत्न प्रशासन तसेच ठेकेदार कंपनी करीत आहे. या कामाच्या दिरंगाईला शेतकऱ्यांनी जबाबदार नसून प्रशासन व संबंधीत ठेकेदार कंपनीच असल्याचे सांगितले जात आहे.
येथील कामे आहेत अर्धवट…..
पुणे-सातारा महामार्गावरील वरवे, नसरापूर, धांगवडी, सारोळा येथील उड्डाणपुलांची कामे प्रलंबित आहेत तर कापूरहोळ, हरिश्चंद्री दरम्यान ओढ्यावरील पुलाचे कामही तीन वर्षांपासून अर्धवट स्थितीत आहे. खेड शिवापूर येथे नागरिकांना महामार्ग ओलांडण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही.
पुणे सातारा महामार्गाचे रुंदीकरण करीत असताना नसरापूर हद्दीतील गट नंबर 171, 175, 176, 179 मधील भूमीसंपादन करताना संपादीत क्षेत्राची नुकसान भरपाई अद्यापही मिळालेली नाही. यातून संबंधित शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
– सुधाकर गेनबा कोंडे, शेतकरी, केळवडे
पुणे-सातारा महामार्गाची रेंगाळलेली, अर्धवट कामे तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात संबंधीत विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेवून त्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानंतरही सदर कामे मार्गी लागत नसतील तर शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून हा प्रश्न मार्गी लावू.
– संग्राम थोपटे, आमदार, भोर
या महामार्गावरील अनेक कामे झालेली नसताना टोल आकारणी मात्र केली जात आहे. त्यातही टोलवर होणारी वाहतूक कोंडी, मार्गावर होणारे अपघात याबाबत आक्रमक भूमिका घेत असून लवकरच हा प्रश्न निकाली काढला जाईल.
– कुलदिप कोंडे, शिवसेना नेते, खेडशिवापूर