नियोजित वेळापत्रक कोलमडले : बूथस्तरावरील निवडीची प्रक्रिया सुरु
नगर – “मी पुन्हा येईल’ या माजीमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने भाजपचे पुन्हा राज्यात सरकार येणार या विश्वासाने जिल्ह्यात पक्षातंर्गत निवडणूक प्रक्रिया जोमाने सुरू झाल्या होत्या. परंतू राज्यात सत्ता समिकरण बददले. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस ही महाविकास आघाडीने सत्तारुढ झाल्याने राज्यात आता भाजपची सत्ता येण्याची शक्यता धुसर झाली आहे. त्याचा परिणाम पक्षांतर्गत निवडणुकीवर झाला आहे. पक्षाच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेले निवडणुकीचे वेळापत्रकच पूर्णपणे कोलमडले असून या निवडी आता ढेपाळल्या आहेत. राज्यात सत्तांतर झाल्याने जिल्ह्यातील पक्षाचे बडे नेते या निवड प्रक्रियेपासून लांब गेल्याने स्थानिक कार्यकर्त्यांना निवडणुकीत अडचणीत येत आहेत.
भाजप संघटन पर्व म्हणून पक्षांतर्गत निवडणूक वेळापत्रक निवडणूक अधिकारी सुरेश हळवणकर यांनी जाहीर केले होते. 10 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर सक्रिय सदस्य नोंदणी, 24 नोव्हेंबरपर्यंत सक्रिय सदस्य पडताळणी, 15 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर बूथ अध्यक्ष आणि बूथ समिती सदस्यांची निवड, 25 ते 30 नोव्हेंबरपर्यंत मंडल अध्यक्ष आणि मंडल समिती सदस्यांची निवड, 1 डिसेंबर ते 10 डिसेंबरपर्यंत जिल्हाध्यक्ष व जिल्हा समिती सदस्यांची निवड, 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातून प्रदेश परिषद सदस्य निवड, 15 डिसेंबरला प्रदेशाध्यक्षपदाची निवड असे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते.
त्यानुसार नगर जिल्ह्यासाठी नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक खासदार गिरीष बाटप यांनी जिल्ह्यातील नेते व कार्यकर्त्यांची बैठक घेवून निवडणुकीची माहिती दिली होती. भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी तातडीने मंडल अध्यक्ष निवडीसाठी तालुकानिहाय निवडणूक निरीक्षकांची नियुक्त करून त्यांना वेळापत्रकाप्रमाणे काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु अजूनही बूथस्तरावरील निवडी झाल्या नाहीत.डिसेंबर महिना सुरू झाला असून सध्या जिल्हाध्यक्षाची निवड प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते.
मात्र राज्यात सत्तेचा झालेल्या खेळामुळे भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी नव्याने राजकीय समिकरणे जुळविण्यात आली. महाविकास आघाडी सत्तारूढ झाल्याने जिल्ह्यातील नेते व कार्यकर्त्यांचे अवसान गळाले. त्याचा परिणाम संघटनात्मक निवडणुकीवर झाला. स्थानिक नेत्यांनी या निवडीकडे दुर्लक्ष केल्याने बूथस्तरावरील निवडी रखडल्या आहेत. या नेत्यांची चर्चा करूनच निर्णय होणे अपेक्षित आहे. पण नेतेच या प्रक्रियेपासून लांब असल्याने कार्यकर्त्यांची अडचण झाली आहे. निवड रखडल्याने पुढील मंडल म्हणजे तालुकाध्यक्षांच्या निवडी लांबणीवर पडल्या आहेत.