भाजपची राज्य सरकारवर खोचक टीका
मुंबई : मुख्यमंत्री पदावर आल्यानंतर पहिला महत्वाचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी आरे मेट्रो कारशेड आणि नाणार रिफायनरी प्रकल्पासंबंधी घेतला. तसेच याप्रकल्पा विरोधात आंदोलन करणाऱ्याविरोधातील गुन्हे मागे घेण्याचा आदेशही मुख्यमंत्र्यांनी नुकताच दिला आहे. मात्र यामुळे विरोधी पक्षात असणाऱ्या भाजपाने राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गुन्हे मागे घेण्याचा हंगाम सध्या सुरु असून घाई करा थोडेच दिवस बाकी आहेत असा टोला भाजपा मुंबईचे सरचिटणीस मोहित भारतीय यांनी लगावला आहे. यावेळी त्यांनी आता दाऊदलाही क्लीन चीट मिळेल असाही टोला लगावला आहे.
Sources : Dawood May Get all Cases Withdrawn and Get Clean Chit from Maharashtra Government Soon . AS ITS CASES WITHDRAWN SEASON GOING ON . HURRY UP LIMITED DAYS LEFT …
— Mohit Bharatiya (@mohitbharatiya_) December 2, 2019
मोहित भारतीय यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, सूत्र: दाऊदवरील सर्व गुन्हे मागे घेतले जाण्याची शक्यता आणि लवकरच महाराष्ट्र सरकारकडून क्लीन चीट देणार आहे. कारण सध्या गुन्हे मागे घेण्याचा हंगाम सुरु आहे. घाई करा…थोडेच दिवस बाकी आहेत.
नाणार येथे तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याविरोधात आंदोलन करणाऱ्या 72 जणांविरोधातील गुन्हे मागे घेण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिला. मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रविवारी आरे कारशेडसाठी झाडे तोडण्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर नाणारविरोधी आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्यात यावेत, अशी मागणी पुढे आली. नाणारसंदर्भात आमदार राजन साळवी यांच्यासह 33 जण, राष्ट्रवादीचे अजित यशवंतराव यांच्यासह 16 जणांविरोधात पुतळा जाळल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. अशोक वालम यांच्यासह आंदोलनात सहभागी 23 जणांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले होते. हे गुन्हे मागे घेण्याचा आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोमवारी प्रशासनाला दिला.