नगर – भारतीय हवामान खात्याकडून प्रसिध्द झालेल्या सूचनेनुसार आरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे दिनांक 6 ते 8 नोव्हेंबर 2019 या कालावधीत उत्तर मध्य महाराष्ट्राला मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
नगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत दिनांक 4 नोव्हेंबर 2019 रोजी 3 हजार 155 क्यूसेस, भिमा नदीस दौंड पूल येथे 4 हजार 340 क्यूसेस, घोड धरणातून घोड नदीत 3 हजार 600 क्यूसेस, निळवंडे धरणातून प्रवरा नदीत पात्रात 350 क्यूसेस, ओझर बंधाऱ्यातून प्रवरा नदीत 1 हजार 72 क्यूसेस व मुळा धरणातून मुळा नदीपात्रामध्ये 2 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन पर्यायाने नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.
आगामी काळात नगर, नशिक व पुणे जिल्ह्यात पावसामुळे वा धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ झाल्यास जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रवरा, गोदावरी, भिमा, घोडे, कुकडी या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हयातील तमाम नागरिकांना आवाहन करण्यात येते की, स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावेत. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे, तसेच पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासून दूर राहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. तसेच नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये.
जुन्या /मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहण्याऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्ये, धबधबे डोंगर माथा, घाट कपारी, जंगल रस्ते येथे पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये. अचानक नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास जीवितास धोका उद्भवू शकतो. धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरु नये. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये, मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रक कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत पाटील यांनी कळविले आहे.