अँटिग्वा: मधल्या फळीतील फलंदाज पूनम राऊतच्या तडाखेबंद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताच्या महिला क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजचा 53 धावांनी पराभव केला. या विजयासह या दोन संघांमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट स्पर्धेत भारताने 1-1 अशी बरोबरी साधली. पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 2 बाद 17 अशा दयनीय स्थितीतून पूनम राऊत आणि कर्णधार मिताली राज यांनी जबाबदारीने खेळ केला व डाव सावरला. मिताली भरात असताना बाद झाली मात्र हरमनप्रित कौरने पूनमला साथ देताना संघाला दीडशतकी मजल मारून दिली. एका बाजूने गडी बाद होत असताना अखेर पूनमने आक्रमक फलंदाजी केली. मात्र, याच प्रयत्नात तीदेखील बाद झाली. तिने 77 धावांची खेळी केली.
विजयासाठी 192 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेले. राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव आणि दीप्ती शर्मा यांच्या फिरकी गोलंदाजीसमोर यजमानांचा डाव कोसळला. शेमेन कॅंपबेलने थोडीफार चमक दाखविली मात्र तिला अन्य सहकारी खेळाडूंकडून योग्य साथ न मिळाल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पूनम राऊत सामन्याची मानकरी ठरली.