आळंदी –अधिक श्रावण महिन्यातील कमला एकादशीनिमित्त शनिवारी (दि. 12) तीर्थक्षेत्र आळंदीत एक लाखापेक्षा जास्त भाविकांनी माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. एकादशीनिमित्त माऊली मंदिरात गाथा भजन, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, हरिजागर आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
भाविकांची मोठी संख्या लक्षात घेता भाविकांना इंद्रायणीवरील भक्ती सोपान पुलावरून पान दरवाजातून मंदिरात प्रवेश देण्यात आला तर महाद्वारातून भाविकांना बाहेर जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच हनुमान दरवाजा आणि गणेश दरवाजा बंद ठेवण्यात आला होता, अशी माहिती श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.
अखंड हरिनाम सप्ताह निमित्त सिद्धभेट माऊली मंदिर व इतर ठिकाणी साधक व भाविकांना येथील सामाजिक युवा कार्यकर्ते राहुल चव्हाण यांचे वतीने अन्नदान महाप्रसाद वाटप केला जात आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांची संजीवन समाधी असलेले तीर्थक्षेत्र आळंदी हे राज्यातील महत्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी आहे. आळंदीला माऊलींच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची रिघ असते. मात्र सध्या अधिक महिना असल्याने आळंदीला येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे. त्यातच सलग 5 दिवस सुट्ट्या आल्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात तीर्थक्षेत्रांना भेटी देत आहेत.
अधिक महिन्यामुळे व्यापाऱ्यांना सुगीचे दिवस
आळंदी परिसरात सातत्याने हरिनाम सप्ताह होत असतात; मात्र अधिक महिन्यानिमित्त गेली महिनाभर विविध ठिकाणी हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. चोहीकडे हरिनामाचा गजर ऐकायला मिळत आहे. अलंकापुरी धार्मिक कार्यक्रमात रंगून गेली असल्याचे चित्र आहे. एकादशीनिमित राज्यभरातून आलेल्या भाविकांची इंद्रायणी घाट, प्रदक्षिणा मार्गावर दिवसभर वर्दळ सुरू होती. गेली महिनाभरापासून आळंदीला दररोज हजारो भाविक भेट देत आहेत. त्यामुळे आळंदीतील व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत.