पुणे – करोनामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही वारी होऊ शकली नाही. तरीही करोनाच्या नियमांचे पालन करून आळंदी-पंढरपूर-आळंदीची सायकलवरून वारी करण्यात आली आहे. ॲड. सम्राट रावते, संजय कंकणवाडी, मनिष महाजन, हरदेश देसले, कुणाल करंजकर, डॉ. सचिन बाविसकर, अजित घुले, रुपेश पोटे आणि सचिन बोटे या नऊ सायक्लोहोलिक्स सायलिंग ग्रुपच्या सायकलस्वारांनी 458 किलोमीटरचे अंतर पार करत ही वारी पूर्ण केली.
नऊ जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता आळंदी येथून माऊलींचे दर्शन घेऊन सर्वजण सायकलवरून पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी पंढरपूर येथे पोहोचले. त्याच दिवशी सायंकाळी 7 वाजता परतीचा प्रवास सुरू झाला.
रविवारी दुपारी 12 वाजता एकुण 41 तासांपैकी 22 तास सायकल चालवून 458 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून सर्वजण आळंदी येथे पोहोचले.
पाऊस, विरूध्द दिशाने येणारे वारे आणि अमावस्येच्या अंधारात न डगमगता हा प्रवास पूर्ण करण्यात आला. यामध्ये महेश पांचाळ यांनी बॅकअप वाहनाचे सारथ्य केले.