आळंदी, (ज्ञानेश्वर फड/एमडी पाखरे) – कार्तिकी यात्रा आणि संत ज्ञानेश्वर महाराज 726वा संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन तयारीला वेग आला आहे. गुरुवार (दि. 17) ते बुधवार (दि.23) कालावधित आळंदीतील उत्सव सोहळा पार पडणार आहे. रविवार (दि.20) कार्तिकी एकादशी तर मंगळवार (दि. 22) संजीवन समाधी सोहळा आहे. यंदा 5 लाखापेक्षा अधिक भाविक यात्रेला येण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने तयारीला सुरुवात केली आहे. पोलीस बंदोबस्त, पास व्यवस्था, पाणी व्यवस्था, दर्शनबारी, आरोग्य सुविधा यांची तयारी सुरु आहे. शहरात प्रमुख चौकांमध्ये पोलिस मदत केंद्रे उभारण्यात येत आहेत. मंदिरात भाविकांना माऊलींच्या दर्शनाची व्यवस्था सुरु आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी शहरात जंतुनाशक धुर फवारणी करण्यात आली आहे. देखभाल दुरुस्तीचे कामही पूर्णत्वास येत आहे. टाळ, पखवाज, फुल-प्रसादाची दुकाने गजबजली आहेत. शहरात ठिकठिकाणी दुकाने, तात्पुरती हाॅटेल्स उभारणी सुरु आहे.
यात्रेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त –
कार्तिकी यात्रेसाठी पिंपरी-चिंचवड पोलीसांकडून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये 8 सहायक पोलीस आयुक्त, 50 पोलिस निरीक्षक, 193 उपनिरीक्षक, 1250 अंमलदार, 250 वाहतूक अंमलदार, 650 होमगार्ड यांचा समावेश आहे. तसेच एसआरपीएफच्या 3 कंपन्या, एनडीआरएफच्या 2 तुकड्या, बीडीडीएसचे 2 पथक मदतीला पाचारण करण्यात येणार आहेत. शहरातील प्रमुख चौकांमध्ये आणि आवश्यक त्या ठिकाणी पोलिस मदत केंद्रे उभारण्यात येत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने शहरात 235 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. अनाउसिंग सिस्टीमद्वारे भाविकांना सुचना मिळणार आहे. यात्रेनिमित्त आलेल्या दिंड्यांच्या ठिकाणी पोलीस पेट्रोलिंग नेमण्यात येणार आहेत. 6 हाॅकर्स स्काॅड तैनात असणार आहे.
पास व्यवस्था –
भाविकांच्या वाहनांकरिता पिवळ्या रंगाचा व स्थानिकांचे वाहनांकरिता गुलाबी रंगाचा असा वेगवेगळे पास तयार करण्यात असून भाविक आणि स्थानिक नागरिकांना पाससाठी आळंदी पोलीस स्टेशनमध्ये अर्ज करावा लागणार आहे. दि. 19,20,21,22 तारखेला शहरात रस्त्यांवर भाविकांची तुडुंब गर्दी असणार आहे त्यामुळे स्थानिक व भाविकांनी आपली वाहने 19 तारखेच्या आत पार्किंगचे ठिकाणी लावावीत आणि ती पुन्हा बाहेर काढू नये असे आवाहन आळंदी पोलिसांनी केले आहे. दरम्यान, यात्राकाळात (दि. 17) ते (दि.23) दरम्यान, भाविकांची वाहने आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांशिवाय इतर वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. लोणीकंद-मरकळ-आळंदी रस्ता बंद असून भाविकांनी दिंड्यांची वाहने इतर पर्यायी मार्गाने आळंदीत आणावित.
“संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 726वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात होणार आहे. करोनानंतर हा सोहळा निर्बंधमुक्त होणार असल्यामुळे भाविकांची संभाव्य संख्या लक्षात घेऊन बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भाविकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, काही अडचण अथवा समस्या आल्यास नजीकच्या पोलीस मदत केंद्र किंवा 112 क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा.” – सुनिल गोडसे (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, आळंदी)
हेही वाचा – Alandi Kartiki Yatra 2022: कार्तिकी यात्रेनिमित्त आळंदीत 7 दिवस वाहनांना प्रवेशबंदी