ENG vs PAK – टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला ५ गडी राखून धूळ चारली. जोस बटलरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या इंग्लंड संघाने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाच्या विजेतेपदाचा मान मिळवला आहे. परंतु सामन्यात पाकिस्तानने केवळ १३७ धावा करूनही इंग्लंडला शेवटपर्यंत झुंज द्यावी लागली. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत इंग्लंडला अडचणीत आणले होते, मात्र बेन स्टोक्सने दमदार कामगिरी केली आणि संघाला १९ व्या षटकात विजय मिळवून दिला. त्याने यादरम्यान ५२ धावांची नाबाद अर्धशतकीय खेळी केली.
#ENGvsPAK । इंग्लंडने कोरलं टी-२० विश्वचषकावर नाव, पाकिस्तानला ५ गडी राखून धूळ चारली
सामन्यानंतर ( ENG vs PAK ) पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम म्हणाला की, “इंग्लंड संघाचे अभिनंदन, त्यांनी सामन्यात चांगला संघर्ष केला त्यामुळे ते चॅम्पियन होण्यास पात्र होते. आम्हाला इथे खेळताना मायदेशात असल्यासारखे वाटले, कारण प्रत्येक ठिकाणी आम्हाला चाहत्यांकडून खूप पाठिंबा मिळाला आहे. आम्ही आमचे पहिले दोन सामने गमावले, पण त्यानंतर आम्ही ज्या पद्धतीने शेवटच्या चार सामन्यांमध्ये पुनरागमन केले ते आश्चर्यकारक होते. मी माझ्या संघातील खेळाडूंना नेहमी त्यांचा नैसर्गिक खेळ खेळायला सांगितले.”
बाबर पुढे म्हणाला की,”आमच्या संघाने केवळ २० धावा कमी केल्या असे मला वाटते. कारण तेवढ्या धावा अधिक केल्या असत्या तर सामन्याचा निकाल वेगळा आला आसता. परंतु संघाच्या गोलंदाजांनी कडवी झुंज देत चांगली गोलंदाजी केली. आमची गोलंदाजी जगातील सर्वोत्तम गोलंदाजी आक्रमणांपैकी एक आहे. दुर्दैवाने शेवटच्या क्षणी शाहीन आफ्रिदीच्या दुखापतीने आम्हाला त्रास दिला, पण तो खेळाचा भाग आहे.”
अंतिम सामन्यात ( ENG vs PAK ) नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १३७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने १९ षटकांत ५ बाद १३८ धावा करत टी-२० विश्वचषक जिंकला. सामन्यात बेन स्टोक्सने अष्टपैलू कामगिरी करत गोलंदाजीत १ गडी बाद केला, तर फलंदाजीत नाबाद ५२ धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला.