पंढरपूर – कार्तिकी वारीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी सुमारे चार लाखांहून अधिक भाविक पंढरपूरात दाखल झाले आहेत. अशातच गोव्यावरून आलेल्या एका भाविकाला चोरट्यांनी बेदम मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोव्यातील सत्तरी तालुक्यातील 40 भाविक कार्तिकी वारीसाठी पंढरपूरात सोमवारी दाखल झाले होते. रात्री 11 वाजताच्या सुमारास हे भाविक दर्शनासाठी रांगेत उभे राहिले. यावेळी त्यांच्यातील एक भाविक लघुशंकेसाठी दर्शनरांगेतून बाहेर गेला आणि बेपत्ता झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सदर व्यक्ती पंढरपूर रेल्वे स्टेशन येथे निर्वस्त्र अवस्थेत मिळून आला. सध्या या 50 वर्षीय गोव्यातील भाविकावर पंढरपूर सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
लूटमार झालेल्या भाविकाच्या सोबत असलेले महानंद कोळपाटे यांनी एका युट्यूब चॅनलला माहिती देताना म्हंटले आहे की, आम्ही गोव्यातून 40 जण कार्तिकी वारीला पंढरपूरला आलो होतो. सोमवारी सायंकाळी आम्ही पंढरपूरात पोचलो. त्यानंतर रात्री अकरा वाजता आम्ही विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो होतो. आमच्यातील एक जण लघुशंकेला गेला आणि बेपत्ता झाला. दर्शनानंतर सर्वजण ठरलेल्या ठिकाणी पोचले मात्र ते आले नाही.
त्यानंतर आम्ही याबाबत पोलीस स्टेशनला आमच्यातील एक व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. काल तक्रार दिल्यानंतर आम्ही शोधायला गेलो तर रेल्वे स्टेशन परिसरात तो मिळून आला. त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. अंगावर कपडे नव्हते. बाहेरून आलेल्या भाविकांना पंढरपूरात मारहाण होणे हे खुप धक्कादायक आहे. पोलिसांनी अशा भामट्यांना तात्काळ ताब्यात घ्यावे. अन्यथा पंढरपूरला येण्यासाठी लोक घाबरतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणी अशा घटना घडत असतील तर लोकांच्या मनात पंढरपूरला येण्याची भिती तयार होईल, भाविक घाबरतील अशी भावना भाविक व्यक्त करत आहेत.
यावर्षी भाविकांची संख्या कमी –
कार्तिकी यात्रेसाठी विविध भागातून निघालेल्या पायी दिंड्या येथे पोचल्या असून जिकडे पहावे तिकडे हाती भगवी पताका, कपाळी गंध आणि मुखी ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करत निघालेले वारकरी दिसत आहेत. आलेल्या प्रत्येकाला सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. वारकऱ्यांच्या गर्दीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरासह प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागेचे वाळवंट आणि नदीच्या पैलतीरावरील 65 एकर परिसर भक्तीमय झाला आहे. परंतु कार्तिकी यात्रेत दरवर्षी एव्हढी गर्दी होते तेव्हढी गर्दी यंदा दिसत नाही. राज्याच्या काही भागातील दुष्काळी परिस्थिती आणि काही भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान याचा परिणाम यात्रेवर झाला आहे. पंढरपूर नगरीत चोहीकडे हरिनामाचा गजर सुरु आहे.