आळंदी – संत ज्ञानेश्वर महाराज 726वा संजीवन समाधी आणि कार्तिकी एकादशी वारी यात्रेनिमित्त तीर्थक्षेत्र आळंदी येथे शनिवारी (दि.19) दोन लाखापेक्षा जास्त भाविक दाखल झाले आहेत. यावेळी यात्रेत तरुणांपेक्षा वयोवृद्ध भाविकांची संख्या अधिक आहे. वारीला आल्यानंतर माऊलींचे दर्शन घेण्याची भाविकांची इच्छा असते. दर्शन घेण्यासाठी दर्शनबारीत भाविकांना सध्या 8 तासाहून अधिक वेळ लागत आहे. यादरम्यान भाविकांना लघुशंकेसाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने भाविक नाराजी व्यक्त करत आहेत.
यावेळी दर्शनबारीत उभे असलेले नाशिक येथील एका 65 वर्षीय भाविकांनी सांगितले की, आम्ही दर्शनासाठी दुपारी 12 वाजता दर्शनबारीत उभे राहिलो होतो. रात्री 8 वाजताच्या दरम्यान आमचे दर्शन झाले. दर्शनबारीत कुठेही लघुशंकेची सोय नाहीय. तसेच अनेक लोक मधूनच बारीत येत असल्याने जास्त वेळ लागत आहे. तसेच पुढील वेळी प्रशासनाने दर्शनबारीत लघुशंकेची सोय करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, तीर्थक्षेत्र आळंदी येथे माऊलींच्या समाधी सोहळ्यासाठी आज (दि.19) कार्तिक वद्य दशमी दिवशी 2 लाखाहून जास्त भाविक दाखल झाले आहेत. उद्या (दि. 20) आळंदीची मुख्य यात्रा कार्तिकी एकादशी असून मंगळवारी (दि. 22) संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा आहे.