आळंदी, – आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज 726वा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त आता भाविकांची गर्दी वाढत असून पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. अडीच हजाराहून अधिक पोलीस भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. तर गरजेनुसार अधिकचे मनुष्यबळ पाचारण करण्यात येणार आहे. यात्रा काळात अनेकदा चोरी, पाकिटमारीच्या घटना घडत असतात त्यामुळे 24 तास पोलिसांचा पहारा असणार आहे, तसेच सीसीटीव्हीची देखील 24 तास नजर असणार आहे. आळंदी पोलीस स्टेशनमधून यावर लक्ष ठेवण्यात येत आहे.
यात्रेला आलेले बहुतांश वारकरी हे इंद्रायणी घाटावर असतात. याठिकाणी पोलिसांनी जास्तीचे मनुष्यबळ तैनात केले आहे. यात्रेत आळंदी शहराबाहेरील पोलीस बंदोबस्तासाठी आलेले असल्यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शन, आवश्यक सूचना आळंदी पोलीस स्टेशनकडून देण्यात आल्या आहेत.
गुरुवार (दि. 17) माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. यावेळी इंद्रायणी घाटावर रात्री उशिरा पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियोजित ठिकाणांची माहिती आणि त्या ठिकाणी गेल्यावेळी घडलेल्या घटनांची माहिती देऊन दक्ष ठेवत असल्याचे दिसून आले.
दरम्यान, रविवार (दि.20) कार्तिकी एकादशी (आळंदी यात्रा) असून मंगळवार (दि. 22) माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आहे. यात्रेनिमित्त लाखो भाविक आता आळंदीत दाखल होत आहेत. शहरात सगळीकडे भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून हरिनामाचा गजर ऐकू येत आहे.