गाझीपूर – समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना फक्त “एक समुदाय आणि एक जात” याची काळजी आहे असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथील एका प्रचार सभेत बोलताना केला. ते म्हणाले की उत्तर प्रदेशातील निवडणुका या राज्यातील मागासलेल्या आणि दलित समाजातील लाखो लोकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आहेत आणि आम्ही पुन्हा सत्तेवर आल्यानंतर हे काम अधिक प्रभावीपणे करून शहा यांनी योगी सरकारने केलेल्या कामांची यादी यावेळी सादर केली.
ते म्हणाले की भाजप पुन्हा सत्तेत आल्यास होळी आणि दिवाळीला मोफत गॅस सिलिंडर दिला जाईल. भाजपने केवळ गरिबांच्या विकासासाठी काम केले आहे आणि त्यांना मोफत रेशन, वैद्यकीय सुविधा, घरे दिली आहेत, त्यांच्या घरांना वीज मिळेल याचीही खात्री केली आहे असे ते म्हणाले.अखिलेश यादव यांना फक्त एका समाजाचे लोक दिसतात. त्यांना केवळ स्वत:च्या जातीच्या लोकांचे कल्याण साधायचे आहे असा आरोपही त्यांनी केला.
सपा सत्तेत असताना त्यांनी केवळ मुस्लिम आणि यादवांची बाजू घेतल्याचा आरोप अमित शहांनी केला.आम्ही थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसे पाठवले आहेत असे नमूद करून त्यांनी म्हटले आहे की, भाजप सत्तेवर आल्यास पुढील पाच वर्षे शेतकऱ्यांना वीज बिल भरावे लागणार नाही.आम्ही मुलींना मोफत स्कूटर देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यातील विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेटही देण्यात येणार आहेत असेही ते म्हणाले.
आम्ही पूर्वीच्या सरकारच्या काळात माफियांच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर गरिबांसाठी घरे बांधत आहोत,असा दावाही शहांनी केला. भाजपच्या राजवटीत, यूपी ऊस उत्पादन आणि इतर कृषी उत्पादनांमध्ये अग्रेसर म्हणून उदयास आले आहे, परंतु सपा आणि बसपा राजवटीत, राज्य खून आणि बेकायदेशीर शस्त्रास्त्रांच्या निर्मितीमध्ये अव्वल होते असेही ते म्हणाले. भाजपच्या राजवटीत यूपीमध्ये गुन्हेगारीच्या घटना झपाट्याने कमी झाल्याचा दावा शहा यांनी केला.