जामखेड – ज्यांनी जे काही काम केले त्याचे श्रेय त्यांना दिले पाहिजे. कोरोना काळानंतर आम्ही आमदारांचा निधी ४ कोटी केला तर केंद्रानं खासदार निधी बंद केला. आधीच्या आमदारांनी व्यवस्थित काम न केल्यानं ते काम अडचणीत येत होते. आता रोहित पवार प्रयत्न करत आहेत. या कामांसाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून निधी मिळत आहे. त्यामुळे अमुक एखादं काम माझ्या काळात मंजूर झालं तर त्यात काही तथ्य नाही. कामं वेळेत पूर्ण करावी लागतात. १० वर्ष आमदार असताना तुम्ही जे केले ते दिसते. परंतु आता रोहित पवार कामं करतायेत. त्यामुळे त्यांच्या कामाचं श्रेय लाटण्याचं प्रयत्न करू नका. आता जरा गपगुमान बसा, आपलं कुठं चुकलं त्याचं आत्मपरिक्षण करा असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार राम शिंदे यांना लगावला आहे.
जामखेड शहर व तालुक्यातील विविध विकासकामांचा एकत्रित भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, आमदार रोहीत पवार, आ.लहू कानडे, आ.निलेश लंके, आ.संग्राम जगताप उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले, राज्यात केंद्र व राज्याच्या माध्यमातून रस्ते विकासाची अनेक कामे सुरू करण्यात आली आहेत. आमदार निधी ४ कोटी करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन मंडळांना शंभर टक्के निधी देण्यात आला आहे. शेतकरी कर्जमाफी, नैसर्गिक संकटात आपत्तीग्रस्तांना मदत,कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी भरघोस निधींच्या माध्यमातून राज्याने काम केले. शेतकऱ्यांना ३ लाखापर्यंत कर्ज शून्य टक्के व्याज दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला. जनतेने ही शासनाला पाठबळ देण्याची गरज आहे. थकीत वीज बीले भरली पाहिजेत, पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे.
करोना संकटातून राज्य सावरत आहे. १० कोटींच्या पेक्षा जास्त लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. मात्र पुन्हा तिसरी लाट येऊ नये. यासाठी प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळत कोरोना नियमावलीचे नियमितपणे पालन केले पाहिजे. असे आवाहन ही पवार यांनी यावेळी केले.
त्रिपुरामधील घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये तुरळक जाळपोळ झाली.
याबाबत बोलतांना पवार म्हणाले, काही समाजकंटक लोक समाजात तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. अशा लोकांच्या भूलथापांना बळी होऊ नका. अफवांवर विश्वास ठेवू नका. राज्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर जातीपातीच्या विचार न करता समाजाच्या माणूसकीचा विचार करा. ऊसाला जास्तीत भाव मिळावा यासाठी शासन साखर कारखानादारांशी चर्चा करत आहे. शेती उत्पादनाला चांगला भाव मिळण्यासाठी मार्केट कमिट्या मजबूत झाल्या पाहिजेत.
एस.टी. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मात्र प्रवाशी हिताचा पण विचार झाला पाहिजे, असे ही पवार यांनी सांगितले. खर्डा परिसरातील संत सिताराम गड, संत गीतेबाबा, शिवपट्टण किल्ला, निंबाळकर वाडा, बारा ज्योतिर्लिंग या स्थळांचा पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहिती ही पवार यांनी यावेळी दिली.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, कोरोना संकटात राज्याची आरोग्य सेवा बळकट करण्याचं काम शासनातर्फे करण्यात आले आहे. मागील दोन वर्षांत कर्जत-जामखेड मध्ये ९८ कामांच्या माध्यमातून ६३७ कोटींची कामे मंजूर करण्यात आली. रस्ते कामासोबत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यावर भर देण्यात आला. हे उल्लेखनीय आहे.
कार्यक्रमापूर्वी चौंडी येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार व उपस्थितांनी अभिवादन केले.
जामखेड शासकीय विश्रामगृह विस्तारीकरण, पंचायत समिती दुस-या मजल्याचे बांधकाम, अधिकारी-कर्मचा-यांच्या शासकीय निवासस्थानाचे बांधकाम, शहरांतर्गत सिमेंट कांक्रिट रस्ता , नगरपरिषद प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, नाना-नानी उद्यान, सामाजिक सभागृह, व्यापारी संकुल, मुस्लिम दफनभूमी बांधकाम व सुशोभीकरण अर्थसंकल्प व विशेष दुरुस्ती कार्यक्रम अंतर्गत मंजूर १२० किमी लांबीचा रस्ता, १४०रूपये कोटींच्या पाणी पुरवठा योजना व जामखेड शहरातील विविध कामांचा लोकार्पण सोहळा यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी जामखेड येथे कोरोना काळात उत्कृष्ट आरोग्य सेवा देणारे रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ.रवी व शोभा आरोळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.