पिंपरी – राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील फुटीनंतर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे उर्से टोलनाक्यावर भावी मुख्यमंत्री म्हणून फलक झळकले आहेत. यामुळे राजकीय वतुर्ळांत जोरदार चर्चा रंगली आहे.
आमदार पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक झळकल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (दि.24) प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, भावी मुख्यमंत्री म्हणून फलक झळकण्याचे कोणी बाकी राहिले नसेल. मात्र, असे फलक लावून काहीही होत नसते. ज्यांच्याकडे 145 आमदार आहेत तोच मुख्यमंत्री होतो. नाहीतर तोपर्यंत ते दिवा स्वप्नच राहते.
अजित पवार, सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून यापूर्वी फलक झळकले होते. कॉंग्रेसमधील नेत्यांचेही फलक लागले होते. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील फुटीनंतर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे उर्से टोलनाक्यावर भावी मुख्यमंत्री म्हणून फलक झळकले आहेत. अजित पवार गटातील नेत्यांकडून सातत्याने रोहित पवार यांच्यावर टीका केली जाते. रोहित यांना अजितदादांची जागा घ्यायची असल्याचा आरोप केला जातो. त्यानंतर आता रोहित यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, कोणी कोणाचे फलक लावायचे हा, ज्याचा त्याचा अधिकार आहे. आता भावी मुख्यमंत्री म्हणून फलक झळकण्याचे कोण बाकी राहिले नसेल. पण, असे फलक लावून काय होत नसते. ज्यांच्याकडे 145 आमदार आहेत तोच मुख्यमंत्री होऊ शकतो. तुमची आकडा गाठण्याची तयारी सुरू आहे का, असे विचारले असता मी काम करत राहतो, असेही ते म्हणाले.