मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 2 मे रोजी राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आणि सर्वत्र खळबळ उडाली. अनेक नेते, कार्यकर्त्यांनी राजनीमा मागे घेण्याची मागणी केली. अखेर शरद पवारांनी दोन दिवसानंतर राजीनामा मागे घेत असल्याचा निर्णय घेतला. यावर काल ‘सामना’ वृत्तपत्रातील अग्रलेखात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. त्यानंतर संजय राऊत यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
अजित पवार म्हणाले की, “एखादी व्यक्ती मनाला वाटेल तसं काहीही बोलत असेल तर त्यांच्या मताला महत्त्व देण्याचं काहीही कारण नाही, त्यांचं वैयक्तिक मत आहे. ‘सामना’च्या संपादकांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. त्याचं मत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं मत नसते, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. जेवढ्या व्यक्ती असतील, तेवढी वेगवेगळी मतं असू शकतात. त्यामुळे त्यांचं मत तसं असले तरी महाराष्ट्राच्या जनतेचं तसं मत नाही.”
पुढे अजित पवार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट भाजपबरोबर जाण्यासाठी बॅगा भरून तयार होता, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. त्यावर शरद पवारांनी काय सांगितलं? हे तुम्ही ऐकलं का? आमच्या राष्ट्रीय नेत्याने सांगूनही कुणी त्यांच्या मनाला वाटेल तसं बोलत असेल तर त्याला महत्त्व द्यायचं काहीच कारण नाही.”
काय लिहिले होते ‘सामना’ अग्रलेखात ?
शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजेच शरद पवार हे समीकरण आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला आणि टिकवला. पण शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही. पक्षाचा शेंडा, बुडखा, बुंधा सर्व काही महाराष्ट्रातच आहे. पवार यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान आहे. पण पक्ष पुढे नेणारा वारसदार ते निर्माण करू शकले नाहीत. त्यात शरद पवार अपयशी ठरले आहेत, असेही सामना अग्रलेखात म्हंटले होते.