मुंबई – एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत पडलेल्या दोन गटामुळे शिवतीर्थ अर्थात दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर होणार दसरा मेळावा कोण घेणार, यावर बरीच चर्चा रंगत आहे. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असल्याचा निर्धार केला आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या उद्धव कदम यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी बंडखोर शिंदे गटावरही टीकास्त्र डागले आहे.
यासंदर्भात माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. “सगळ्यांनाच परवानगी मागण्याचा अधिकार आहे. पण वर्षानुवर्ष सगळी महाराष्ट्रातली जनता बघत होती की शिवसेनेची स्थापना जेव्हापासून झाली, तेव्हापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्याच सभा तिथे व्हायच्या. बाळासाहेब ठाकरेंनी शेवटी त्याच शिवाजी पार्कच्या मैदानावर सांगितलं होतं की इथून पुढे ही शिवसेना उद्धव ठाकरे पाहतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली चालेल. पण त्यानंतर गेल्या २० जूनपासून ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या आहेत त्या सगळ्यांनी पाहिल्या आहेत” , असं अजित पवार यावेळी म्हणाले.